गोकाक-चिकोडी जिल्ह्यांची निर्मिती करा
आमदार भालचंद्र जारकीहोळी यांची मागणी
बेळगाव : बेळगाव जिल्हा भौगोलिकपणे मोठा आहे.जिल्ह्याचे विभाजन करून गोकाक आणि चिकोडी हे दोन स्वतंत्र जिल्हे घोषित करावेत, अशी मागणी माजी मंत्री व अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी केली आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्यावेळी ही घोषणा करण्याची मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी करण्यात आली आहे. गेल्या 40 वर्षांपासून गोकाक जिल्ह्यासाठी आंदोलन सुरू आहे. जिल्हा पुनर्रचनेसाठी यापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या चारही आयोगांनी प्रशासनाच्यादृष्टीने बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून नव्या जिल्ह्यांची स्थापना करण्याच्या शिफारशी केल्या आहेत. गोकाक जिल्ह्यासाठी मठाधीश, व्यापारी, वकील आदी विविध संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. सर्वपक्षीय राजकीय नेतेही या आंदोलनात आहेत. उत्तम प्रशासनासाठी जिल्ह्याचे विभाजन करावे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी संपूर्ण सरकारच बेळगावमध्ये असते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गोकाक व चिकोडी जिल्ह्यांची घोषणा करावी, अशी मागणी भालचंद्र जारकीहोळी यांनी केली आहे. पालकमंत्र्यांनाही यासंबंधी आपण विनंती केली आहे. अधिवेशनावेळी मुख्यमंत्र्यांनी गोकाक व चिकोडीच्या नागरिकांना गोड बातमी द्यावी. दोन्ही जिल्ह्यांची घोषणा करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.