स्वातंत्र्यलढ्यात संगोळ्ळी रायण्णांचे महान योगदान
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे प्रतिपादन : एकाच वेळी चार ठिकाणी पुतळा उद्घाटन
बेळगाव : कौजलगी, ता. गोकाक येथे उभारण्यात आलेल्या क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा पुतळ्याचे व किल्ल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते सोमवारी अनावरण करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकाच दिवशी चार गावात रायण्णा पुतळ्यांचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, एकाच दिवशी वेगवेगळ्या गावात पुतळ्यांचे उद्घाटन केल्याचा आपल्याला अभिमान वाटतो. संगोळ्ळी रायण्णा हे कित्तूर संस्थानच्या राणी चन्नम्मांचे उजवे हात होते. संस्थान वाचविण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध प्राणपणाने लढलेले ते महान योद्धा होते. ते पराक्रमी, धैर्यशाली होते. ब्रिटिशांविरुद्धच्या पहिल्या युद्धात कित्तूर संस्थान विजयी झाले. मात्र, कुतंत्रामुळे दुसऱ्यांदा झालेल्या युद्धात कित्तूरकरांचा पराभव झाला. ब्रिटिशांनी राणी चन्नम्मांना कैद केले. तरीही संगोळ्ळी रायण्णा थांबले नाहीत. त्यांचा एकाकी लढा सुरूच होता. ते महान देशप्रेमी होते. रायण्णांनी स्वातंत्र्यलढ्यात दिलेले योगदान प्रेरणादायी आहे.
म्हणून सतत त्यांचे स्मरण व्हावे, यासाठी संगोळ्ळी येथे सैनिक शाळा व म्युझियम उभारले आहे, असे सिद्धरामय्या यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी, रामदुर्गचे आमदार व विधानसभेतील मुख्य प्रतोद अशोक पट्टण, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे आदी उपस्थित होते. यावेळी पुतळा अनावरणासाठी मुख्यमंत्री खुल्या वाहनातून पुतळ्यापर्यंत गेले. या मिरवणुकीत विविध कलापथके सहभागी झाली होती. डोक्यावर कलश घेऊन सुवासिनींनी सहभाग घेतला होता. संगोळ्ळी रायण्णांची वेशभूषा केलेला घोडेस्वारही होता. या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
सरकार अस्थिर करण्यासाठी षड्यंत्र रचल्याचा आरोप
आपल्या 40 वर्षांच्या राजकीय जीवनात एकही काळा डाग लावून घेतला नाही. भाजप-निजदने आता आपल्याला डाग लावण्याचा प्रयत्न चालवला आहे, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. कल्लोळ्ळी येथे क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा पुतळ्याचे अनावरण करताना सध्या आपल्याविरुद्ध सुरू असलेल्या राजकीय षड्यंत्राचा उल्लेख करीत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. आम्ही सारे एकत्रितपणे या षड्यंत्राविरुद्ध लढा देऊ. सात कोटी लोकांचे जोपर्यंत आपल्यावर आशीर्वाद आहेत, तोपर्यंत आपल्याला कोणीही धक्का लावू शकत नाही. आपण दोन वेळा मुख्यमंत्री झालो. भाजप-निजदला ते सहन होत नाही. त्यामुळेच सरकार अस्थिर करण्यासाठी त्यांनी षड्यंत्र रचल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. गोकाक तालुक्यातील कळ्ळीगुद्दी, यादवाड येथेही पुतळ्यांचे उद्घाटन करण्यात आले.