कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पावसाची संततधार अन् महापुराची भीती

10:33 AM May 28, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर :

Advertisement

पावसाळा जवळ आला की पूरग्रस्तांच्या महापुराच्या आठवणी ताज्या होतात. 2005, 2019 आणि 2021 या दोन वर्षात कोल्हापूर आणि सांगली जिह्यात झालेली अपरिमित हानी कधीही विसरण्यासारखी नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे असलेली महापुराची भीती संपणार कधी? असा प्रश्न दोन्ही जिह्यातील नागरिकांतून उपस्थित केला जात आहे, अशा परिस्थितीत अलमट्टी धरणाच्या जलाशयाची उंची वाढविण्यावर कर्नाटक सरकार ठाम असल्यामुळे दोन्ही जिह्यातील नागरिक धास्तावले आहेत.

Advertisement

महापूर टाळण्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या वडनेरे समितीने दिलेल्या अहवालात सुचवलेल्या 18 शिफारशीनुसार जागतिक बँकेच्या सहकार्याने शासनाकडून कार्यवाही केली जाणार आहे. पण ही अंमलबजावणी करताना महापूरास जबाबदार असलेल्या घटकांचा शास्त्राrय पद्धतीने अभ्यास करून त्यावर ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे. 2019 आणि 2021 च्या पावसाळ्यात कोल्हापूर शहरासह जिह्याचा सुमारे 50 टक्के भागाला महापुराने वेढला होता. अल्पकालावधीत पडणाऱ्या ढगफुटी सदृष्य पावसामुळे पुन्हा अशी आपत्ती निर्माण होऊ नये, तसेच अशी परिस्थिती पुन्हा उद्भवल्यास त्याची तीव्रता कमी व्हावी, यासाठी वडनेरे समितीने शिफारशी सुचवल्या आहेत. पण त्यानुसार आजतागायत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. पण आता जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य मिळणार असल्यामुळे सुचवलेल्या उपाययोजनांनुसार कार्यवाही करणे शक्य होणार आहे.

पंचगंगा खोऱ्यातील विस्तृत पाणलोट क्षेत्रात अत्यल्प काळात झालेली सातत्यपूर्ण अतितिव्र पर्जन्यवृष्टी, पूरप्रवण भागाची वैशिष्टयपूर्ण भौगोलिक परिस्थिती व नदीची रचना, पूर प्रवण क्षेत्रात नागरिकरण, बांधकामे, अतिक्रमणे आदीमुळे पूर प्रवाहास अडथळे व नदीपात्राचे झालेले संकुचीकरण, शहरी व ग्रामीण भागातील पूरपाणी निचरा व्यवस्थेची खालावलेली परिस्थिती, नद्यांमधील नैसर्गिक पूरवहन क्षमतेत झालेली अभूतपूर्व घट, नद्यांमधील गाळसाठ्यामुळे उंचावलेले व अरूंद झालेले नदीपात्र, धरणांतर्गत पूर सामावून घेण्याची खास वेगळी साठवण क्षमता नसल्यामुळे पूरनियमनात असलेल्या मर्यादा आदी अनेक कारणे महापूरासाठी कारणीभूत ठरली आहेत.

पंचगंगा आणि कृष्णा नद्यांमध्ये अनेक वर्षांपासून साठलेल्या गाळामुळे नदीपात्राची खोली सुमारे 4 ते 5 मीटरने कमी झाली आहे. त्यामुळे पाण्याची वहन क्षमता घटली आहे. प्रयाग ते नृसिंहवाडी असा पंचगंगेचा 81 कि.मी. अंतराचा प्रवाह असून उतार अतिशय अल्प आहे. सुमारे दहा हजार फुटाला एक फूट अशा प्रमाणात हा संथ उतार आहे. मुळात संथ उतार आणि पात्रात साठलेल्या गाळामुळे नदीपात्रात पाणी धारण करण्याची क्षमता कमी झाली आहे. नदीपात्रातील साठलेला गाळ हे पुराचे पाणी वेगाने वाहून न जाण्यातील महत्त्वाचे कारण आहे. राधानगरी धरणाचे दरवाजे स्वयंचलित आहेत. ते बदलून वक्रद्वारे बसवावीत, ही वडनेरे समितीची शिफारस आहे. राधानगरी तालुक्यातील तारळेजवळील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातून बोगद्याद्वारे व ओढ्याच्या पात्रातून सरवडे गावाजवळ दूधगंगा नदीत सोडणे शक्य होईल का? असा मुद्दा समितीने मांडला आहे. तसे झाल्यास राधानगरीतून होणाऱ्या विसर्गाचा काही भाग दूधगंगा खोऱ्यात वळल्यास राधानगरीतील विसर्गाचे प्रमाण कमी होऊन महापूर परिस्थिती नियंत्रणात येईल, अशी वडनेरे समितीची धारणा होती. पण या उपाययोजनांनुसार अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

वडनेरे समितीच्या अहवालानुसार कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांऐवजी बॅरेज उभारणे, नद्यांना मिळणाऱ्या शहरातील नाल्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण, नद्यांची काही ठिकाणी असलेली अतितीव्र वळणे बदलणे, पूरबाधित क्षेत्रातील अतिक्रमणे काढणे अशा या शिफारशी आहेत. या शिफारशीची तातडीने अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. यामध्ये गाळ काढण्यासाठी कोल्हापूर जिह्यासाठी सुमारे 120 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

समितीच्या अहवालानुसार पूर निवारणार्थ नदीनाले संरक्षण व पुर्नस्थापन, पूरप्रवण क्षेत्रांच्या संरक्षणासह पुर्नस्थापन, पूर मुकाबला सज्जता, पूरप्रवण क्षेत्रातील अवैध वापरावर चाप, एकूणच अतिक्रमणा विरुध्द ठोस धोरणांचे अवलंबन करणे, पूरनिवारणार्थ व हवामान बदलाविषयकच्या महाराष्ट्र राज्य हवामान बदल रुपांतर धोरण परिणामकारकरित्या राबविणे. प्रतिबंधीत क्षेत्रातील अतिक्रमणे प्राधान्याने हटविण्याबाबत ‘फ्लड प्लेन व झोनिंग नियम’ कोल्हापूर, सांगली जिह्यासाठी लागू करणे. परिणामकारक पूर निवारणार्थ सशक्त, ठोस पूर पूर्वानुमान पध्दतीचा वापर करणे आवश्यक आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article