टिळकवाडी परिसरात दूषित पाणीपुरवठा
बेळगाव : टिळकवाडी परिसरात दूषित पाणीपुरवठा करण्यात आल्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एलअॅण्डटी कंपनीच्या कारभारावर शहरवासियांतून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. मनपाने याची दखल घेऊन कंपनीला सूचना करावी, अशी मागणी शहरवासियांतून करण्यात येत आहे. टिळकवाडी परिसरातील मंगळवार पेठ व इतर भागांमध्ये गुरुवारी दूषित पाणीपुरवठा झाला आहे. पावसामुळे अनेक आजार वाढत आहे. यातच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एलअॅण्डटी कंपनीकडून दूषित पाणीपुरवठा केला जात असल्याने आजारांमध्ये भर पडण्याची शक्यता आहे. दूषित पाणी पिल्याने नागरिकांना आजार होण्याची दाट शक्यता आहे. पाण्याची चाचणी करून पाणीपुरवठा करणे आवश्यक असताना दूषित पाणीपुरवठा केला जात असल्याने याची तत्काळ दखल घेऊन शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.