अनगोळ येथे दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा
बेळगाव : अनगोळ परिसरात मागील काही दिवसांपासून दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा केला जात आहे. एलअॅण्डटी कंपनीकडून वारंवार दुरुस्ती करून देखील दूषित पाणी वितरीत केले जात असल्याने रोगराईचे प्रमाण वाढले आहे. आधीच वाढता पाऊस व गारठ्यामुळे आजारी पडणाऱ्यांची संख्या अधिक असताना दूषित पाण्यामुळे रोगराई पसरत आहे. लक्ष्मी टेकडी येथील जलशुद्धीकरण केंद्र स्वच्छता केल्यानंतर स्वच्छ पाणीपुरवठा केला जाईल, असे एलअॅण्डटीकडून सांगितले होते. परंतु अद्यापही तसाच पुरवठा होत आहे. अनगोळसह इतर उपनगरांमध्येही दूषित पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. परंतु त्यानंतरही दूषित पाण्याचा पुरवठा सुरूच आहे.
साथीच्या रोगांचा फैलाव
पाण्यात लालसर मातीचे कण असून पाण्याला दुर्गंधी येत आहे. त्यामुळे हे पाणी घरात वापरायचे कसे? असा प्रश्न आहे. सध्या साथीच्या रोगांचा फैलाव सुरू असताना या दूषित पाण्याच्या सेवनामुळे आजार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जावा, अशी मागणी होती.