जन्मभूमी स्थळीच मंदिराची उभारणी
प्राणप्रतिष्ठेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची स्पष्टोक्ती
राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उपस्थितांना संबोधित केले आहे. श्रीराम जन्मभूमी जगातील पहिले असे अनोखे प्रकरण राहिले असेल, ज्यात कुठल्याही राष्ट्राच्या बहुसंख्याक समुदायाने स्वत:च्या देशात स्वत:च्या आराध्याच्या जन्मस्थळावर मंदिर उभारणीसाठी इतक्या वर्षांपर्यंत लढाई लढली असेल असे उद्गार योगींनी काढले आहेत.
आजचा (सोमवार) दिवस माझ्या जीवनातील सर्वात मोठ्या आनंदाचा आहे. श्रीराम जन्मभूमी मुक्तीच्या संकल्पामुळेच मला पूज्य गुरुदेव, राष्ट्रसंत ब्रह्मलीन महंत श्री अवैद्यनाथ महाराज यांचे पुण्य सान्निध्य प्राप्त करता आले. श्रीराम जन्मभूमी मुक्ती महायज्ञ केवळ सनातन श्रद्धा तसेच विश्वासाच्या कसोटीचा काळ राहिला तसेच संपूर्ण भारताच्या एकात्मकतेला सूत्रात बांधण्यासाठी राष्ट्राच्या सामूहिक चेतना जागरणाच्या ध्येयात देखील यशस्वी ठरला आहे. श्रीराम जन्मभूमी मंदिराची स्थापना भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचे आध्यात्मिक अनुष्ठान आहे. हे ‘राष्ट्र मंदिर’ आहे. नि:संशय श्री रामलल्ला विग्रहाची प्राणप्रतिष्ठा राष्ट्रीय गौरवाची ऐतिहासिक संधी आहे, असे योगींनी म्हटले आहे.
प्रदीर्घ काळानंतर आले आहेत रामलल्ला
ज्या ठिकाणी उभारणी करण्याची आम्ही शपथ घेतली होती, त्याच ठिकाणी मंदिर उभारणी झाल्याने आम्ही आनंदी आहोत. 500 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर प्रभू श्रीरामलल्लाच्या विग्रहाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी ऐतिहासिक आणि अत्यंत पावन क्षणी पूर्ण भारत भावनाप्रधान झाला आहे. अवधपुरीत श्री रामलल्ला विराजमान होणे भारतात ‘रामराज्याच्या स्थापनेची उद्घोषणा’ आहे. ‘सब नर करहिं परस्पर प्रीती, चलहिं स्वधर्म निरत श्रुती नीती’ची परिकल्पना साकार झाली असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी नमूद केले आहे.
प्रत्येकजण अयोध्येत येतोय
रामकृपेने आता कुणीच श्री अयोध्या धामच्या पारंपरिक परिक्रमेत अडथळे निर्माण करु शकणार नाही. येथील गल्ल्यांमध्ये गोळीबार होणार नाही आणि शरयू रक्ताने न्हाऊन निघणार नाही. श्री अयोध्या धाममध्ये संचारबंदीचा कहर नसणार आहे. येथे उत्सव असेल, रामनाम संकीर्तनचा गजर होणार आहे. प्रत्येक नेत्र आता आनंद आणि स्वप्नपूर्तीच्या भावनेमुळे पाणावलेले असतील, आता प्रत्येक मार्ग श्रीराम जन्मभूमीच्या दिशेने येत असल्याचे उद्गार योगींनी काढले आहेत.
संकल्प झाला पूर्ण
श्रीराम जन्मभूमी मंदिरात विराजमान प्रभू श्रीरामाचे बालस्वरुप प्रत्येक सनातन भाविकाच्या जीवनात धर्मपालनासाठी मार्ग प्रशस्त करणार आहे. संतांनी आशीर्वाद दिला तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच विश्व हिंदू परिषदेसारख्या सामाजिक-सांस्कृतिक संघटनांनी रुपरेषा निश्चित केली, जनतेला एकजूट केली. अखेरीस संकल्पसिद्धी झाली, व्रत पूर्ण झाले, संन्यासी, संत, पुजारी, नागा, निहंग, बुद्धिवंत, राजकीय नेते, वनवासींसमवेत समाजाच्या प्रत्येक घटकाने जात, विचार-दर्शन, पंथ-उपासना पद्धत बाजूला ठेवत रामकाजासाठी स्वत:ला वाहून घेतले होते, असे योगींनी म्हटले आहे.
अयोध्येला प्राप्त झाले गतवैभव
अयोध्या नगरी स्वत:चा गमावलेला गौरव पुन्हा प्राप्त करत आहे. न्याय आणि सत्याच्या संयुक्त विजयाचा हा उल्हास भूतकाळातील कटू स्मृतींना नष्ट करत एक नवे कथानक रचत आहे. हा पावन क्षण समाजात समरसतेची सुधा प्रवाहित करत असल्याचे प्रतिपादन योगींनी केले आहे.