राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यासाठी पुलाची बांधणी करा
बसवण कुडची केएचबी कॉलनीतील नागरिकांची मागणी
बेळगाव : बसवण कुडची येथील केएचबी कॉलनीपासून राष्ट्रीय महामार्गापर्यंतचा रस्ता पूर्ण झाला असून दोन्ही बाजूचा रस्ता जोडण्यासाठी केवळ एका पुलाची गरज असून राज्य सरकारने हा पूल बांधल्यास येथील दोन ते तीन हजार नागरिकांना ये-जा करणे सोयीचे होणार आहे. त्यामुळे सरकारने या मागणीची दखल घेऊन पूल तयार करावा, अशी मागणी केएचबी कॉलनी येथील रहिवाशांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. बेळगाव शहराच्या जवळच असणाऱ्या बसवण कुडची गावाशेजारी 2008 मध्ये कर्नाटक गृहनिर्माण मंडळाने वसाहत वसविली. एकूण 500 एकर जागेमध्ये ही वसाहत असली तरी येथे कोणत्याही सेवासुविधा उपलब्ध नाहीत. अनेकवेळा मागणी करूनदेखील नागरिकांसाठी रस्तादेखील उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. सध्या पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाला येण्यासाठी 10 ते 12 कि. मी. वळसा घालून यावे लागते. केएचबी कॉलनी ते राष्ट्रीय महामार्गापर्यंत काम पूर्ण झाले असून केवळ एक पूल होणे बाकी आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने या पुलाचे बांधकाम केल्यास नागरिकांना ये-जा करणे सोयीचे होणार आहे, अशी मागणी नागरिकांनी राज्य सरकारकडे केली आहे. यावेळी शिवानंद हालपण्णावर, देवाप्पा कऱ्याकट्टी, बाहुबली कुरकुरे, संतोष राठोड यांच्यासह इतर उपस्थित होते.