For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाणी टंचाई टाळण्यासाठी विहिरींचे संवर्धन महत्त्वाचे

06:45 AM Jun 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
पाणी टंचाई टाळण्यासाठी विहिरींचे संवर्धन महत्त्वाचे
Advertisement

मान्सूनचे उशिरा झालेले आगमन आणि अनियमित पावसामुळे पुढीलवर्षी पाणीटंचाईची भीती निर्माण झाल्याने, सरकारने अचानक जलसंधारणाचे महत्त्व ओळखले व बोअरवेल वापरकर्त्यांसाठी पर्जन्यजल संचयन व भूजल पुनर्भरण अनिवार्य करण्याची योजना जाहीर केली आहे. परंतु, राज्य सरकार संभाव्य संकट टाळण्यासाठी धडपडत असतानाच, हे पाऊल म्हणजे अनेक वर्षांपासून निर्माण होत असलेल्या समस्येवर उशिरा दिलेला प्रतिसाद, अशीच परिस्थिती झालेली आहे. आपण शहरी भागातील विहिरी एकतर बुजवून टाकल्या किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. आज खऱ्या अर्थाने या विहिरींचे संवर्धन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Advertisement

जवळपास दोन दशकांपासून तज्ञांनी इशारा दिला होता की, अनियंत्रित भूजल उपसा, बेसुमार काँक्रिटीकरण, जंगले आणि जांभ्या दगडाच्या पठारांचा विनाश, जलस्रोतांचे प्रदूषण आणि विद्यमान नियमांची कमकुवत अंमलबजावणी, यामुळे गोवा ‘जल-आणीबाणी’च्या दिशेने ढकलला जात आहे. त्या इशाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष केले गेले. यंदा मान्सून लांबल्याने सरकारसमोर बाका प्रश्न निर्माण झाला होता. आता पाऊस सुरू झाल्याने काहीसा दिलासा मिळाला असला, तरी संभाव्य धोका टळलेला नाही.

यंदा, सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविला जात असल्याने, सरकार संवर्धनाचे उपाय लागू करण्यासाठी घाई करीत आहे. ‘यावर्षी पर्जन्यमान कमी होण्याची शक्मयता असल्याने जलसंधारण अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्व बोअरवेल वापरकर्त्यांनी जलसंधारणाचे उपाय योजलेच पाहिजेत, असे परिपत्रक जारी करण्याचे निर्देश जलसंधारण विभागाला दिले आहेत,’ असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे. ‘पाण्याचे संवर्धन करणे आणि जलाशय, विहिरी व भूजल स्रोतांचे पुनर्भरण करणे आवश्यक आहे. जिथे शक्मय असेल, तिथे आपण पाणी वाचविलेच पाहिजे; अन्यथा, पुढच्या वर्षी पाण्याची मोठी टंचाई निर्माण होऊ शकते,’ असे विधानही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

Advertisement

तथापि, अनेक वर्षांच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेल्या संकटावर केवळ बोअरवेल वापरकर्त्यांना लक्ष्य करून तोडगा काढता येईल का, असा प्रश्न तज्ञ उपस्थित करीत आहेत. गोव्यात पर्जन्यजल संचयनाचे नियम आधीपासूनच अस्तित्वात असून त्याकडे सर्रास दुर्लक्ष होत आलेले आहे. पाऊस कमी पडतो की नाही, हा मुद्दा नाही. जर जलसंधारण केले जात नसेल तर कोणत्याही प्रकल्पाला परवानगी देऊ नये. मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. प्रत्येक घर आणि विकास प्रकल्पाला पर्जन्यजल संचयन करणे बंधनकारक केले पाहिजे. जलसंधारण सुरू केल्यावर त्यांच्या स्वत:च्या विहिरींमधील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते.

पूर्वी गोव्यात ग्रामीण तसेच शहरी भागात मोठ्या प्रमाणात विहिरीच्या पाण्याचा वापर केला जायचा मात्र सरकारने घरोघरी नळ पुरविण्यास प्रारंभ केल्यानंतर विहिरींकडे दुर्लक्ष झाले. अनेकांनी आपल्या विहिरी बुजवून टाकल्या. विहिरी बुजविण्याचे प्रमाण हे शहरी भागात अधिक आहे. शहरी भागात सांडपाण्यामुळे विहिरी प्रदुषित होऊ लागल्याने, विहिरीच्या पाण्याचा वापर बंदच झाला मात्र आता पाण्याची टंचाई होऊ लागली तेव्हा, अशा विहिरींची गरज असल्याचे स्पष्ट चित्र पुन्हा एकदा निर्माण झालेले आहे.

शहरी भागातील विहिरी उपसणे, त्यांची स्वच्छता करणे, विहिरींच्या परिसरात सांडपाणी झिरपणार नाही, याची काळजी घेतल्यास अशा विहिरींचे पाणी घरातील भांडी व कपडे धुणे, वाहने धुणे तसेच गार्डनसाठी वापरले जाऊ शकते. केवळ पिण्याच्या पाण्यासाठी सरकारी नळ योजनेचा लाभ घेतल्यास पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते. शहरात मलनिस्सारण योजना अत्यंत प्रभावीरित्या राबविल्यास विहिरी प्रदुषित होण्याचे प्रमाण नियंत्रणात येऊ शकते. त्यासाठी शर्थीने प्रयत्न होणे आवश्यक आहे.

नैसर्गिक जलसाठे आणि पुनर्भरण जलस्तर म्हणून काम करणारे जांभ्या दगडाची पठारे बेसुमार बांधकाम आणि काँक्रीटीकरणामुळे नष्ट होत आहेत. हीच खरी आज धोक्याची सूचना आहे.

गंभीर पाणीटंचाईबाबत आपले मत मांडताना, वास्तुविशारद आणि जलसंधारण तज्ञ टॅलुला डिसिल्वा म्हणतात की, राज्य आधीच पाणी टंचाईच्या गर्तेत आहे. आपण गंभीर पाणीटंचाईत आहोत आणि सरकार व जनता आत्ता कुठे याबद्दल जागी होत आहे. त्यांनी निदर्शनास आणून दिले की, कमी जनजागृती आणि अधिकृत प्रसिद्धीच्या अभावामुळे पर्जन्यजल संवर्धनासाठी मिळणारे एक लाख ऊपयांपर्यंतचे अनुदान अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर न वापरता पडून आहे. गोव्याच्या समस्या केवळ अपुऱ्या मान्सूनपुरत्या मर्यादित नाहीत. पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी झाडे जबाबदार असतात. त्यामुळे ती तोडू नका. गोव्याने आपला बराचसा हिरवागार प्रदेश गमावला आहे. यासाठी आपण सर्व जबाबदार आहोत.

गोव्यात ‘बहुतेक’ बोअरवेल बेकायदेशीर आहेत. विहिरी कोरड्या पडण्यास त्या जबाबदार आहेत. सुमारे 10,000 ऊपये खर्चून साधे पुनर्भरण ख•s खोदल्यास भूजल पुनर्भरणात लक्षणीय सुधारणा होऊ शकते. जर आपण हे उपाय योजले नाहीत तर आपला विनाश अटळ आहे, असा इशारा टॅलुला डिसिल्वा यांनी दिला आहे.

दत्तात्रय आंबुलकर

Advertisement
Tags :

.