काँग्रेस लोकसभेच्या 15 ते 20 जागा जिंकेल
जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचा विश्वास
बेळगाव : लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यामध्ये काँग्रेस पक्ष 15 ते 20 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ते उद्दिष्ट निश्चित गाठू, असा विश्वास जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केला. काँग्रेस भवन येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. निवडणुकीमध्ये विविध राजकीय पक्षांचे उमेदवार स्पर्धा करणार आहेत. मतदार वेगवेगळ्या राजकीय पक्षांना मतदान करतात. त्यामुळे सर्व मतदारसंघात आमचे उमेदवार विजयी होतील, हे शक्य नाही. सर्वच मतदारसंघात आम्हीच जिंकतो, असे आम्ही सांगणार नाही. भाजपसमोर आव्हान निर्माण करून आमच्या शक्तीनुसार उमेदवारांना निवडून आणण्याची योजना आखण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीराम आहेत. श्रीरामांच्या नावावर भाजपकडून राजकारण केले जात आहे. रामाच्या नावावर मतदारांना आकर्षित केले जात आहे. सर्वपक्षीयांकडून रामाची पूजा केली जाते. नुकताच अयोध्या येथे श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना करताना अनेक घरांवर भगवा ध्वज फडकविण्यात आला होता. त्यामुळे ते मतदार भाजपचेच असल्याचे सांगता येणार नाही. मोदींना विजयी करा देशाला वाचवा, असा नारा दिला जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, आपल्या पक्षाकडूनच अधिक जागा जिंकण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी योजना आखण्यात आली आहे. संविधान वाचवा, काँग्रेसला विजयी करा, असा नारा दिला जात आहे, असे त्यांनी सांगितले. चिकोडी लोकसभा मतदारसंघातून तिकीट कोणाला द्यावे, यावरून मते जाणून घेतली जात आहेत. विधानसभा मतदारसंघातून मते जाणून घेण्यात आली आहेत. चार मतदारसंघातून जाणून घेणे आवश्यक आहे. तर बेळगाव मतदारसंघातून उमेदवार उभे करण्यासंदर्भात 20 मार्चला मते जाणून घेण्यासाठी बैठक बोलाविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रमेश कत्ती यांनी पक्षात प्रवेश केल्यास कोणतीच समस्या नाही
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये असणारा असंतोष उफाळून आला होता. आताही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे भाजपला रामराम ठोकून नेते आणि कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आल्यास स्वागत करू. रमेश कत्ती आपल्या पक्षाचे तत्त्व आणि सिद्धांत मान्य करून पक्षात प्रवेश केल्यास कोणतीच समस्या नाही. मात्र तिकीट देण्यासंदर्भात हायकमांड निर्णय घेते, असेही त्यांनी सांगितले.