काँग्रेसला नारीशक्तीची प्रचीती 4 जूनला येईल : तानावडे
काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्या वक्तव्याचा केला निषेध
पणजी : देशातील शक्तीवरून काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी केलेले वक्तव्य नारीशक्तीचा अपमान करणारे व सर्वांच्या वर्मी लागणारे असले तरी हीच ‘नारी’ म्हणजे किती मोठी ‘शक्ती’ आहे त्याची प्रचीती येत्या 4 जून रोजी येईल. त्यावेळी काँग्रेस तोंडघशी पडेल, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी केले आहे. राहूल गांधी यांच्या वक्तव्याचा त्यांनी जोरदार निषेध केला. मंगळवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत हेते. यावेळी माजी खासदार विनय तेंडुलकर आणि आमदार संकल्प आमोणकर यांचीही उपस्थिती होती. पुढे बोलताना तानावडे यांनी, दक्षिण गोव्यात उमेदवार जाहीर करण्यात विलंब होत असला तरी त्यामुळे मतदारांवर कोणताही परिणाम होणार नाही, असे सांगितले. कारण भाजपात व्यक्ती नव्हे तर चिन्ह महत्त्वाचे असते. तसेच जाहीर केलेला उमेदवार हा पुऊष आहे की महिला यावरूनही काहीच फरक पडणारा नसतो. त्यामुळे आमचे दोन्ही उमेदवार ’कमळ’ चिन्हावरच विजयी होतील, असे ते म्हणाले. उमेदवार निवडण्यात अजिबात वेळ झालेला नाही. आज बुधवारपर्यंत उमेदवार जाहीर करण्यात येईल. पक्षश्रेष्ठी देतील त्या उमेदवारासाठी काम करणे हे आमचे काम असेल. कारण अद्याप उमेदवार जाहीर झालेला नसला तरी आमचे काम थांबलेले नाही. विविध पातळीवर प्रचाराचा धडाका आणि मतदारांच्या गाठीभेटीही सुरूच आहेत असे तानावडे म्हणाले.