विरेश बोरकर यांच्या आंदोलनास काँग्रेसचा पाठिंबा
प्रतिनिधी/ पणजी
आमदार विरेश बोरकर व इतरांच्या पणजीतील आझाद मैदानावर चालू असलेल्या आंदोलनास काँग्रेस पक्षाने पूर्ण पाठिंबा दिला असून नगरनियोजन कायद्यातील 39 (अ) हे कलम रद्द करण्याची मागणी केली आहे.
काँग्रेसचे प्रसार माध्यम प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, गोव्यात जमीन जेवढी आहे तेवढीच राहणार असून ती वाढणार नसल्याने टिकवणे फार महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर शेती, टेकड्या, डोंगर, शेतजमीन यांचेही रक्षण झाले पाहिजे. परंतु वरील कलमामुळे गोव्यातील शेतजमिनी, डोंगर-टेकड्या यांचे मोठ्या प्रमाणात रुपांतर करण्यात येत असून त्याला कोणीच वाली राहिलेला नाही. सरकार कोणालाही न जुमानता 39-ए कलमानुसार वाटेल ती जमीन कोणालाही न विचारता, विश्वासात न घेता रुपांतरीत करीत आहे. म्हणून 39-ए हे कलमच रद्द झाले पाहिजे. बोरकर हे तरुण आमदार त्यासाठीच संघर्ष करीत असून तोच विषय सध्या गोव्यात धगधगतो आहे व ज्वलंत बनला आहे, अशी माहिती पणजीकर यांनी दिली.
दरम्यान, आरजी पक्षाचे प्रमुख तुकाराम ऊर्फ मनोज परब यांच्यावर पणजीकर यांनी जोरदार हल्लाबोल करून टीका केली. परब हे आमदार बोरकर आणि त्यांचे आरोग्य तसेच 39-ए वर न बोलता निवडणुकीच्या युतीबाबत भाष्य करतात. काँग्रेसच्या अध्यक्षांवर टीका करतात ते पूर्णपणे चुकीचे असल्याचे पणजीकर यांनी निदर्शनास आणून दिले.