काँग्रेस पक्ष संपण्याच्या मार्गावर
वृत्तसंस्था /पुंछ
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्षाचे अध्यक्ष गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या उलथापालथीवरून वक्तव्य केले आहे. काही लोकांचा कमकुवतपणा आणि अहंकार यामुळे सर्वात जुना पक्ष संपुष्टात येऊ लागला असल्याचे वक्तव्य आझाद यांनी पुंछ येथे बोलताना केले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडणे काँग्रेससाठी मोठा झटका आहे. चव्हाण यांचे काँग्रेसमध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांचे वडिलही काँग्रेसचे दिग्गज नेते होते. आगामी काळात आणखी अनेक नेते पक्ष सोडणार असल्याचे आझाद म्हणाले. भारतात केवळ महाराष्ट्रातूनच काँग्रेसला पुनरुज्जीवित केले जाऊ शकते. उत्तरप्रदेश आणि बंगाल यासारख्या मोठ्या राज्यांमध्ये काँग्रेस संपुष्टात आल्याचे आझाद यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआने 400 जागांचा आकडा ओलांडल्यास याकरता इंडिया आघाडीचे नेते जबाबदार असणार आहेत. मी काही ज्योतिषी नसल्याने भाजप 400 च आकडा ओलांडणार की नाही हे सांगू शकणार नाही. मी आता काँग्रेसमध्ये नाही आणि भाजपशी जवळीकही नाही. जर भाजप काही चुकीचे करत असेल तर मी त्याच्यावर टीका करणारा पहिला व्यक्ती असेन. अशाचप्रकारे काँग्रेस काही चांगले करत असल्यास त्या पक्षाची प्रशंसा करत असल्याचे आझाद यांनी म्हटले होते.