काँग्रेसने देशाची एकता-अखंडता राखली
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे प्रतिपादन : भाजपच्या भूमिकेवर टीका
बेळगाव : हुबळी येथील नेहा हिरेमठ या महाविद्यालयीन तरुणीच्या हत्या प्रकरणाचे भाजपकडून राजकारण केले जात आहे. आपला समाज एका तरुणीला गमावून दु:खी आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने सीआयडीकडे प्रकरण सोपविले आहे. विशेष न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर आरोपीला कठोर शिक्षा होणार हे निश्चित आहे. काँग्रेस पक्षाने नेहमीच देशाची एकता व अखंडता राखली आहे, असे महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. बैलहोंगल विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या हिरेबुदनूर, तडसूर, हरगोप्प, मरकुंबी या गावांमध्ये काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांचा प्रचार करून त्या बोलत होत्या. नेहा हिरेमठ हत्या प्रकरण राज्य सरकारने गांभीर्याने घेतले आहे. सीआयडीकडे चौकशी सोपविली आहे. प्रकरणाच्या चौकशीला विलंब होवू नये यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. असे असताना भाजपकडून या विषयाचे राजकारण करत असल्याचा आरोप मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला.
गेल्या दहा वर्षांत असणाऱ्या भाजपकडून काय साध्य करण्यात आले आहे. महागाईने कळस गाठला आहे. यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये काँग्रेस सरकारकडून देशात अनेक विकासकामे राबविण्यात आली आहेत. 502 संस्थांनांचे विलीनीकरण करून देशात एकता राखली आहे, असे मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले. राज्य सरकारकडून पाच गॅरंटी योजना राबवून त्या यशस्वी करण्यात आल्या आहेत. या गॅरंटी योजनांमुळे अनेक कुटुंबांना आधार देण्यात आला आहे. दुष्काळामध्ये या योजनांचा गोर-गरिबांसाठी आधार मिळाला आहे. आमदार महांतेश कौजलगी यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघाचा विकास साधला जात आहे. यासाठी मतदारांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना मतदान देऊन निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, शिवरुद्र हट्टीहोळी, महांतेश मत्तीकोप्प, शंकरगौड पाटील, कार्तिक पाटील, गीता देसाई, एम. एस. पट्टण, इरण्णा साली आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.