काँग्रेसकडूनच देशामध्ये पाणीपुरवठा योजना राबविल्या
मंत्री सतीश जारकीहोळी यांचे प्रतिपादन : तेलसंग येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा
बेळगाव : ब्रिटिशांना भारतातून हाकलल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या सर्व पंतप्रधानांनी देशामध्ये धरण बांधून पाणी पुरवठा योजनांना प्राधान्य दिले आहे. मात्र भाजपकडून एकही धरण देशामध्ये निर्माण केलेले नाही, असा आरोप जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी करुन भाजपवर हल्लाबोल केला. अथणी तालुक्यातील तेलसंग येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते. चिकोडी लोकसभा काँग्रेस उमेदवार यांच्या प्रचारार्थ या मेळाव्याचे आयोजन केले होते. काँग्रेस पक्षाच्या पंतप्रधानांकडून अनेक विकासाभिमुख योजना राबवून इतिहास घडविला आहे. राज्यामध्ये आतापर्यंत सत्तेत आलेल्या काँग्रेस पक्षाच्या मुख्यमंत्र्यांकडून जनहिताच्या योजना राबवून लोककल्याणासाठी मोठी देणगी दिली आहे. सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी योगदान दिले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कार्यकाळात कृषी तलाव निर्माण करण्याची योजना अंमलात आणण्यात आली होती. तर अथणी तालुक्यामध्ये पाणी पुरवठा योजना राबविण्यात काँग्रेस कार्यकाळातच शक्य झाले आहे. केंद्रामध्ये काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले जाईल.
महिलांना वर्षाला एक लाख रुपये, 25 लाखांच्या आरोग्य विम्यासह अनेक योजना जारी केल्या जाणार आहेत. जाहीरनाम्यात या योजनांची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रियांका जारकीहोळी यांच्याकडे खासदार काम करण्याचे सामर्थ्य आहे. आमदार लक्ष्मण सवदी, राजू कागे, गणेश हुक्केरी, महेंद्र तम्मण्णावर यांच्यासह आपल्या सोबत त्यांच्याकडून अनेक विकास कामे राबविली जात आहेत. काम करणाऱ्यांना ओळखून सेवा करण्याची संधी द्यावी. त्यामुळेच सर्वांगीण विकास साधणे शक्य आहे. सर्वांना समानतेने जीवन जगण्यासाठी काँग्रेस पक्षाला सत्तेत आणणे गरजेचे असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी आमदार विश्वनाथ वैद्य म्हणाले, मंत्री सतीश जारकीहोळी हे आपल्या समर्थकांची साथ कधीही सोडत नाहीत. जारकीहोळी यांच्या आशीर्वादानेच आपण आमदार झालो आहोत. यासाठी काँग्रेसच्या प्रियांका जारकीहोळी यांना निवडून द्यावे. यावेळी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. प्रियांका जारकीहोळी यांना निवडून आणण्याचा निर्धार केला. याप्रसंगी काँग्रेस नेते सदाशिव बोटाळे, गजानन मंगसुळी, चिदानंद सवदी, शाम पुजारी, शिव गु•ापूर, उदय शेट्टी, सिद्राय बालीहडलगी, गुरु द्याशनाळ, बाबुकाका जमखंडी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.