मोदींवर टीका करण्याचा काँग्रेसला नैतिक अधिकार नाही
जगदीश शेट्टर : बैलहोंगल तालुक्यात प्रचाराचा धडाका
बेळगाव : भारताचे नाव संपूर्ण जगभरात पोहोचविण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महत्त्वाचे योगदान आहे. मोदी यांच्या संकल्पनेतूनच देश विश्वगुरुच्या दिशेने वाटचाल करीत आहे. देशात 50 वर्षांत जो बदल होऊ शकला नाही तो मोदींनी 10 वर्षांत करून दाखविला आहे. त्यामुळे काँग्रेसला पंतप्रधानांवर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही, असे खडे बोल भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी बैलहोंगल तालुक्यातील बेळवडी येथे आयोजित बैठकीदरम्यान काँग्रेसला सुनावले. जगदीश शेट्टर यांनी सोमवारी तसेच मंगळवारीही बैलहोंगल तसेच परिसरात प्रचारदौरा राबविला. उडिकेरी, बोदिहाळ, हिट्टनगी यासह परिसरातील गावांमध्ये सभा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या कामांची माहिती करून देण्यात आली. देशवासीयांचे स्वप्न असणाऱ्या राम मंदिराचे बांधकाम मोदी यांच्या प्रयत्नांमुळेच पूर्ण होऊ शकले. यापुढेही देशात असे अनेक नवीन बदल घडवायचे असतील तर नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नसल्याचे शेट्टर यांनी सांगितले.
इराण्णा कडाडी यांची काँग्रेसवर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सादर केलेला भाजपचा जाहीरनामा म्हणजेच एक संकल्प आहे. महिला, विद्यार्थी, वयोवृद्ध, कामगार, शेतकरी यांना डोळ्यासमोर ठेऊन परिपूर्ण जाहीरनामा मोदींनी मांडला आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आपले प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. काँग्रेसकडून केवळ घोषणा केल्या जात आहेत. परंतु सक्षम नेतृत्व नसल्याने त्यांना केंद्रात सत्ता मिळविणे शक्य नाही. त्यामुळे मतदारांनी काँग्रेसच्या भुलथापांना बळी न पडता भाजपच्या बाजूने मतदानाचा कौल द्यावा, अशी विनंती राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेतून मतदारांना केली.
भाजपचे आज शक्तिप्रदर्शन
बेळगाव मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर हे बुधवार दि. 17 रोजी शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी 10 वाजता समादेवी गल्ली येथील श्री समादेवी मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मिरवणूक काढून अर्ज दाखल केला जाणार आहे. केंद्र तसेच राज्यातील भाजपचे नेते व पदाधिकारी यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातून कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार असल्याने भाजपकडून जय्यत तयारी केली जात आहे.