For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कारगिल युद्धात सहभागाची कबुली

06:56 AM Sep 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
कारगिल युद्धात सहभागाची कबुली
Advertisement

25 वर्षांनंतर पाकिस्तान लष्कराचे वक्तव्य

Advertisement

► वृत्तसंस्था / इस्लामाबाद

1999 च्या कारगिल युद्धात आपलीही भूमिका होती, अशी कबुली पाकिस्तानच्या लष्कराने दिली आहे. या युद्धानंतर 25 वर्षांनी ही कबुली देण्यात आली आहे. या युद्धात पाकिस्तानचा दणकून पराभव झाला होता. त्यामुळे त्यात आमचा सहभाग नव्हताच. ते दहशतवाद्यांचे कृत्य होते, असा कांगावा पाकिस्तानी लष्कराने आजवर केला होता. तथापि, आता सत्य मानण्याची वेळ त्याच्यावर आली असल्याचे, पाकिस्तान लष्करप्रमुखंच्या वक्तव्यांवरुन दिसून येत आहे.

Advertisement

रावळपिंडी येथील पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयात पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी नुकतेच हे वक्तव्य केले आहे. 1948, 1965, 1971 आणि कारगिल युद्ध या चार संघर्षांमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या हजारो सैनिकांनी प्राण गमावले आहेत, असे त्यांचे वक्तव्य आहे. याचाच स्पष्ट अर्थ कारगिलच्या युद्धातही पाकिस्तानच्या अधिकृत सैनिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता, असाच आहे. भारताने नेहमीच हे युद्ध पाकिस्तानच्या सैनिकांनीच घडवून आणले आहे, असा आरोप केलेला आहे. दहशतवाद्यांच्या बुरख्याआड पाकिस्तानी सैनिकच या युद्धात सहभागी होते असे भारताचे म्हणणे राहिलेले आहे.

भारताचा आरोप खरा...

पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांच्या या वक्तव्यामुळे भारताचा आरोप खरा असल्याचे स्पष्ट होते, असे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे. या घटनेला 25 वर्षे झाल्यानंतर आज पाकिस्तानने ही कबुली का दिली, असाही प्रश्न निर्माण होत आहे. 1999 च्या जुलै महिन्यात पाकिस्तानच्या सैनिकांनी दहशतवाद्यांच्या पेहरावात कारगिलच्या टेकड्यांवर आक्रमण केले होते. तथापि, हे लक्षात आल्यानंतर भारताने त्वरित सेना कार्यवाही करुन आपला भाग पुन्हा मिळविला होता. मात्र, या संघर्षाला युद्ध मानण्याचीही पाकिस्तानची आजवर तयारी नव्हती. हा संघर्ष भारताची सेना आणि दहशतवाद्यांमधील होता, अशी पाकिस्तानची भूमिका होती. आता या भूमिकेला पाकिस्तान लष्कर प्रमुखांनीच छेद दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कारगिल दहशतवाद्यांना पाकिस्तानने मुजाहिद्दीन किंवा स्वातंत्र्ययोद्धे असे गेंडस नावही आजवर दिलेले होते.

धोरणात्मक घोडचूक

कागगिल युद्ध ही पाकिस्तानने केलेली धोरणात्मक घोडचूक होती, असे मत त्यावेळी अनेकांनी व्यक्त केले होते. त्यावेळी पाकिस्तानचे नेते नवाझ शरीफ हे होते. त्यांना अंधारात ठेवून त्यावेळच पाकिस्तान लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी भारतात घुसखोरी करण्याची योजना आखली होती. मात्र, त्या युद्धात पाकिस्तानचा प्रचंड पराभव झाला. दहशतवाद्यांच्या वेशात घुसलेल्या हजारो पाकिस्तानी सैनिकांना त्यावेळी जीव गमवावा लागला होता. या दु:साहसामुळे पाकिस्तानी लष्कराची मोठी हानी तर झाली होतीच, पण नामुष्कीही पदरात पडली होती. त्यामुळे पाकिस्तानने नेहमीच या युद्धात आला अधिकृत सहभाग नव्हता, अशी भूमिका घेतली होती.

Advertisement
Tags :

.