बारावी परीक्षेची सांगता
मात्र निकालाची धाकधूक : विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे वेध
बेळगाव : पदवीपूर्व विभागाच्यावतीने घेण्यात आलेली बारावीची परीक्षा शुक्रवारी संपली. शेवटच्या दिवशी हिंदी विषयाचा पेपर घेण्यात आला. परीक्षा संपली असली तरी विद्यार्थ्यांना निकालाची धाकधूक लागली आहे. त्यातच विज्ञान विभागाचे विद्यार्थी सीईटी, जेईई व नीट परीक्षांच्या तयारीला लागले आहेत. 1 मार्चपासून राज्यात बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. यावर्षी बेळगाव जिल्ह्यात 23,565 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे. 21,289 फ्रेशर्स तर इतर रिपीटर्स व बहिस्थ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. शुक्रवारी हिंदी विषयाचा शेवटचा पेपर होता. ज्या विद्यार्थ्यांनी कन्नड व मराठी वगळता हिंदी विषय घेतला होता, त्यांचा शुक्रवारी पेपर झाला. यावर्षी सुरळीत पद्धतीने बारावीची परीक्षा पार पडली. शनिवारपासून पेपर तपासणीच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांच्या अद्याप इतर प्रवेशपरीक्षा असल्या तरी वाणिज्य व कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी मात्र सुटकेचा नि:श्वास सोडला. आता निकाल हाती आल्यानंतर पुढील प्रवेशाबाबत विचार केला जाणार आहे.
आता प्रवेश परीक्षांची तयारी
बारावीची परीक्षा संपताच विज्ञान शाखेचे विद्यार्थी इतर प्रवेश परीक्षांच्या तयारीला लागले आहेत. बारावीपेक्षा सीईटी, नीट, जेईई या गुणांवर उच्चशिक्षण अवलंबून असल्याने जोरदार तयारी केली जात आहे. इंजिनिअरिंग, मेडिकल यासह इतर अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. त्यामुळे पुढील दीड ते दोन महिने विज्ञान शाखेचे विद्यार्थी या परीक्षांच्या तयारीला प्राधान्य देत आहेत.