आरोस - दांडेली रस्त्याची पूर्णतः चाळण
कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा माजी सरपंचांचा इशारा
न्हावेली /वार्ताहर
आरोस - दांडेली मुख्य रस्त्याची पूर्णतः चाळण झाली असून देखभाल व दुरुस्ती व्यवस्थित न झाल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे.या संदर्भात संबंधित विभागाशी पत्रव्यवहार, गाठीभेटी घेऊनही कार्यवाही होत नसून येत्या काही दिवसांत रस्ता दुरुस्तीसाठी सकारात्मक पावलं उचलावी अन्यथा ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा सरपंच शंकर नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.ते म्हणाले की,आरोस - दांडेली मुख्य रस्ता २०१५ -१६ सालात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून झाला होता.मात्र ५ वर्ष याची देखभाल व दुरुस्ती व्यवस्थित न झाल्याने आज रस्त्याची चाळण झाली आहे.त्यामुळे रस्ते खड्डेमय झाला असून ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.या संदर्भात संबंधित विभागाशी पत्रव्यवहार, गाठीभेटी घेऊनही सकारात्मक कार्यवाही होत नाही.येत्या काही दिवसांत रस्ता दुरुस्तीसाठी सकारात्मक पावलं उचलली नाही. तर ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा श्री नाईक यांनी दिला आहे.