शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करा
राज्य रयत संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : दुष्काळ परिस्थितीमुळे संकटात असणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, साखर कारखान्यांना ऊसपुरवठा केलेल्या शेतकऱ्यांचे कारखान्यांकडून थकित बिल त्वरित जमा करण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसीरू सेना यांच्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यामुळे अनेक जण आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहेत. यामुळे सरकारने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, अशी प्रमुख मागणी शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली. राज्य सरकारकडून नवीन ट्रान्स्फॉर्मर घेण्यासाठी शेतकऱ्यांनीच पदरमोड करावी, असा आदेश जारी केला आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत, याची दखल घेऊन पूर्वीप्रमाणेच वीजजोडणी प्रक्रिया राबवावी. अक्रम-सक्रम योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वीजजोडणी करून द्यावी. नवीन वीजजोडणी घेण्यासाठी शेतकऱ्यांना एक ते दोन लाख खर्चावे लागतात. त्यांना इतकी रक्कम भरणे अशक्य आहे. यासाठी पूर्वीप्रमाणे वीजजोडणीची प्रक्रिया राबवावी, अशी मागणी केली.