सावंतवाडी टर्मिनससाठी थेट पंतप्रधानांना साकडे !
कोकण रेल्वेच्या समस्या मांडण्यासाठी तक्रार मोहिम
न्हावेली/वार्ताहर
यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वेच्या अपुऱ्या सुविधेमुळे अनेक अडचणींना सामना करावा लागला.या पार्श्वभूमीवर सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम आणि कोकण रेल्वे मार्गावरील इतर समस्यांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधण्यासाठी थेट त्यांच्याकडे तक्रार करण्याची मोहिम सुरु केली आहे.सत्ताधारी आणि विरोधी नेते मंडळीना वेळोवेळी निवेदने देऊन उपोषण व आंदोलने करुनही सावंतवाडी टर्मिनसच्या कामाला गती मिळत नसल्याने अखेरीस चाकरमानी आणि स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने थेट पंतप्रधान नरेंद्र यांना ई मेलद्वारे साकडे घालण्याचा निर्णय कोकण रेल्वे टर्मिनस संघर्ष समितीने घेतला आहे.
----कोकणवासीयांना रेल्वे टर्मिनसची गरज !
यंदा गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे प्रशासनान मुंबईतून जादा गाड्या सोडून उत्तम नियोजन केले असले तरी पुण्याहून कोकणासाठी एकही विशेष गाडी सोडण्यात आली नाही यामुळे कोकणवासीयांना रेल्वे टर्मिनसचे महत्व पुन्हा एकदा पटले.सावंतवाडी येथील रेल्वे टर्मिनसचे काम गेल्या दहा वर्षांपासून रखडलेले आहे.स्थानके बाहेरुन सुस्थितीत दिसत असली तरी फलाटांवर शेडसारख्या आवश्यक सुविधांचा अभाव आहे.या सर्व बाबी लक्षात घेऊन प्रवाशांनी स्वत : हून पंतप्रधानांकडे तक्रार करावी,असे आवाहन करण्यात येत आहे.पुणे कोल्हापूर नाशिक या भागातही मोठ्या प्रमाणात चाकरमानी आहेत.मुख्यत पुणे भागातून चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात दाखल होत असतात.मात्र रेल्वे प्रशासनाने पुणे सावंतवाडी किवा मडगाव पर्यंत एकही गणेशोत्सव स्पेशल रेल्वे सोडली नाही याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
तक्रारीचा कोड व्हॉटस्अपवर शेअर करा
तक्रार दाखल केल्यावर एक विशिष्ट क्रमांक कोड मिळेल तो व्हॉटस्अप ग्रुपवर शेअर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.जेणेकरुन किती लोकांनी या मोहिमेत घेतला हे कळेल.ही मोहिम जास्तीत जास्त कोकणवासीयांनी आणि मुंबईतील चाकरमान्यांनी पुढे न्यावी,जेणेकरून भविष्यात गणेशोत्सवातील प्रवास अधिक सुखकर होईल,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.