रिक्त एका जागेसाठी महिला आमदारांत चढाओढ
राज्य मंत्रिमंडळात महिलेला संधी देण्याची शक्यता
त. भा. प्रतिनिधी
बेंगळूर :
राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह 33 जणांचा समावेश झाला आहे. मंत्रिमंडळात अजून एक जागा रिक्त असून त्या जागेसाठी महिला आमदारांमध्ये तीव्र चढाओढ निर्माण झाली आहे. लक्ष्मी हेब्बाळकर, नयना मोटम्मा, उमाश्री, गायत्री शांतेगौडा या महिला आमदारांमध्ये मंत्रिमंडळातील रिक्त जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे.
सोमवार 3 ऑगस्ट रोजी राज्य मंत्रिमंडळात 19 जणांचा समावेश झाला. काँग्रेस हायकमांडने तयार केलेल्या 20 जणांच्या यादीत विधानपरिषद सदस्या गायत्री शांतेगौडा यांचाही समावेश होता. मात्र, अखेरच्या क्षणी त्यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यापासून रोखण्यात आले. त्यामुळे रिक्त राहिलेल्या या जागेसाठी काँग्रेसच्या महिला आमदारांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. दरम्यान, मंत्रिपदापासून वंचित राहिलेल्या गायत्री शांतेगौडा पुन्हा प्रयत्नशील असून त्यांनी विधानसौधमध्ये मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेऊन चर्चा केली.
गायत्री शांतेगौडा यांच्याबरोबरच मुडिगेरेच्या आमदार नयना मोटम्मा, विधानपरिषद सदस्या उमाश्री, बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि संडूरच्या आमदार ई. अन्नपूर्णा या देखील मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.
मी डी. के. शिवकुमार यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. चिक्कमंगळूर जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे उमेदवार विधानसभेवर निवडून आले आहेत. महिला आरक्षणासाठी मी आवाज उठविला आहे. मंत्रिमंडळात आम्हाला स्थान मिळाले पाहो. मंत्रिमंडळात संधी मिळाल्यास मी ते प्रभावीपणे सांभाळेन, असे आमदार नयना मोटम्मा यांनी सांगितले आहे. तर माजी मंत्री उमाश्री यांनी, मी मंत्रिपदाची दावेदार आहे. पक्ष योग्य निर्णय घेईल, याचा मला विश्वास आहे. पक्षासाठी मेहनत घेतली आहे. त्यामुळे हायकमांड मला संधी देईल, असे म्हटले आहे. आमदार ई. अन्नपूर्णा यांनी पती माजी खासदार ई. तुकाराम यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने मंत्रिपदासाठी महिला आमदारांमध्ये तीव्र चुरस निर्माण झाली आहे.