मूल्यांकन परीक्षांना प्रारंभ
पाचवी, आठवी-नववीसाठी नवा प्रयोग
बेळगाव : पाचवी, आठवी व नववीच्या मूल्यांकन परीक्षांना सोमवारपासून प्रारंभ झाला. बेळगाव शैक्षणिक विभागात पहिल्या दिवशी सुरळीतपणे परीक्षा पार पडली. पहिल्यांदाच दहावी-बारावी बोर्ड परीक्षांच्या धर्तीवर मूल्यांकन परीक्षा घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांनाही एक वेगळा अनुभव मिळाला. शालांत परीक्षांसह मूल्यांकन परीक्षा एकाच वेळी सुरू झाल्याने शिक्षकांना मात्र तारेवरची कसरत करावी लागली. मूल्यांकन परीक्षा होणार की नाही? याची साशंकता होती. उच्च न्यायालयाने मूल्यांकन परीक्षा रद्द करण्याबाबत सूचना केल्या होत्या. परंतु, दुसऱ्याच दिवशी यावर विचार करून या परीक्षांना हिरवा कंदील देण्यात आला. यामुळे सोमवार दि. 11 पासून मूल्यांकन परीक्षा सुरू झाल्या. बोर्ड परीक्षेप्रमाणेच मूल्यांकन परीक्षेसाठीची व्यवस्था करण्यात आली होती. बेळगाव शहरातील चौदा क्लस्टरमध्ये पहिल्या दिवशीचा पेपर सुरळीत पार पडला. दुपारी दीड वाजता क्लस्टर केंद्रांवर प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या. मुख्याध्यापकांनी या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांवर नेऊन दोन वाजता परीक्षांना सुरुवात झाली. बोर्ड परीक्षेप्रमाणेच इतर शाळांचे पर्यवेक्षक नेमण्यात आले होते. पेपर संपताच उत्तरपत्रिका जमा करून क्लस्टरमध्ये आणून देण्यात आल्या.
शालान्त परीक्षांना सुरुवात
पाचवी, आठवी व नववी वगळता इतर वर्गांच्या शालान्त परीक्षांना देखील सोमवारपासून सुरुवात झाली. आठवडाभरात परीक्षा घेण्यात येणार असून त्यानंतर लगेचच निकाल देण्यात येणार आहे. मार्चअखेरपर्यंत निकाल लागल्यास विद्यार्थ्यांना पुढील वर्गाच्या प्रवेशासोबतच अभ्यासालाही लागता येणार आहे.