‘प्राथमिक’च्या परीक्षा संपल्याने विद्यार्थ्यांकडून रंगोत्सव
आठ दिवस आधीच साजरी केली रंगपंचमी
बेळगाव : बेळगावची रंगपंचमी होण्यास अद्याप आठवडाभराचा कालावधी असताना शालेय विद्यार्थ्यांनी मात्र परीक्षा संपल्याच्या आनंदात सोमवारीच रंगपंचमी साजरी केली. एकमेकांना रंग लावून ‘सुटलो एकदाचे’ असे म्हणत शाळांच्या मैदानावरच आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे शाळांच्या परिसरात रंगपंचमीचा उत्साह दिसून आला. बेळगाव शहरात सोमवार दि. 25 रोजी रंगपंचमी साजरी केली जाणार आहे. त्यापूर्वीच शालेय विद्यार्थ्यांनी परीक्षा संपल्याच्या आनंदात रंगपंचमी साजरी केली. मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या परीक्षा सोमवारी संपल्याने विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. या त्यांच्या आनंदामध्ये रिक्षामामाही सहभागी झाले होते. पेपर संपल्यानंतर रिक्षामामांनी उद्यानांमध्ये नेऊन विद्यार्थ्यांना खाऊचेही वाटप केले. पाचवी, आठवी व नववी इयत्तांच्या मूल्यमापन परीक्षांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे या परीक्षा आठवडाभरापासून रखडल्या आहेत. त्यामुळे या वर्गांमधील विद्यार्थी रोज शाळेत येऊन उजळणी करत आहेत. इतर वर्गांच्या परीक्षा संपल्या तरी न्यायालयाचा निकाल आला नसल्याने विद्यार्थीही संभ्रमात सापडले आहेत. त्यामुळे परीक्षा नेमकी केव्हा होणार? याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना लागली आहे.
एप्रिलमध्ये लागणार निकाल
प्राथमिक विभागाच्या परीक्षा सोमवारी संपल्याने मूल्यमापन प्रक्रियेमध्ये शिक्षक गुंतले आहेत. 8 एप्रिल रोजी सरकारी शाळांमध्ये समुदायदत्त कार्यक्रम होणार असून 10 एप्रिल रोजी वार्षिक निकाल दिला जाणार आहे. यामुळे परीक्षांच्या निकालासाठी विद्यार्थ्यांना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.