बळ्ळारी नाला समस्या निवारणासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार
महामार्ग प्राधिकारच्या अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेणार
बेळगाव : बळ्ळारी नाल्यातील पाण्याचा सुरळीतपणे निचरा होत नसल्यामुळे शेकडो एकर पिकावू जमिनीतील पिकांचे नुकसान होत आहे. अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी अनेकवेळा संवाद साधण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दखल घेऊन पाण्याचा निचरा होण्यापासून निर्माण झालेल्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर तोडगा काढण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. याची लवकरच अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बळ्ळारी नाल्यामुळे निर्माण झालेली समस्या निकालात काढण्यासाठी शेतकरी संघटनांकडून सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यापूर्वीही या समस्येबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. सोमवार दि. 5 रोजी शेतकरी संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून ही समस्या निकालात काढा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याची दखल घेत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी नाल्यातील पाण्याचा निचरा होत नसल्याबद्दलचा अभ्यास करून आराखडा तयार केला आहे.
येळळ्tर पूल-यरमाळ पूल ते राष्ट्रीय महामार्गापर्यंतच्या बळ्ळारी नाल्याची माहिती जाणून घेतली आहे. नाल्याची खोली जाणून घेऊन ही समस्या केव्हापासून निर्माण झाली, याची इत्यंभूत माहिती घेऊन आराखडा तयार केला आहे. राष्ट्रीय महामार्ग निर्माण झाल्यानंतर त्यासाठी उभारण्यात आलेल्या पुलाच्या ठिकाणी पाण्याचा सुरळीत निचरा होत नसल्याने पाणी अडून राहत असल्याचे आढळून आले आहे. नाल्यामध्ये महामार्गाच्या पुलासाठी कॉलम उभारण्यात आले आहेत. या कॉलमांचा पाया नाल्याच्या खोलीपेक्षा अधिक उंचीवर करण्यात आला आहे. यामुळे नाल्यातील पाण्याचा सुरळीत निचरा न होता पाणी आडून राहत आहे. यामुळे इतर भागात फुगवटा निर्माण होऊन शेतवाडीमध्ये पाणी पसरत आहे. हे प्रथमदर्शिनी दिसून आले असून यासाठी लवकरच महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले.