कणकुंबी भागात घरांची पडझड
वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी नुकसान
वार्ताहर /कणकुंबी
कणकुंबी भागात पावसाचा जोर ओसरला. परंतु वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी घरांची पडझड झालेली असून, या दोन-चार दिवसांमध्ये काही ठिकाणी घरांचे पत्रे उडून गेले आहेत तर काही ठिकाणी घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. सुसाट वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. गुरुवारपासून पावसाचा जोर ओसरला असला तरी हवेत गारवा असल्याने नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी झाडे उमळून पडल्याने मुख्य रस्त्याबरोबरच अॅप्रोच रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. वादळी वाऱ्याने बागायत पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कालमणी येथील निंगव्वा नाईक यांच्या राहत्या घराची भिंत कोसळल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. जांबोटी तलाठी व आमटे ग्रामपंचायतीने सदर महिलेला नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे. नदी नाल्यावरील पाण्याची पातळी गेले पाच-सहा दिवस स्थिर आहे.
कणकुंबी भाग आठ दिवसापासून अंधारात
गेले आठ-दहा दिवस कालमणीपासून कणकुंबी, चोर्लापर्यंतची पुढील पंधरा-वीस गावे पूर्णपणे अंधारात आहेत. खानापूर हेस्कॉम खाते मात्र विद्युत पुरवठा सुरळीत करण्यास अपयशी ठरले आहे.
..तर हेस्कॉम कार्यालयावर मोर्चा
सलग आठ-दहा दिवस वीज गायब होत असल्याने नागरिकांना जीवन जगणे मुश्कील झाले आहे. येत्या एक-दोन दिवसात विद्युतपुरवठा सुरळीत झाला नाही तर खानापूर हेस्कॉम कार्यालयावर मोर्चा काढून टाळे ठोकण्यात येतील असा इशारा कणकुंबी भागातील नागरिकांनी दिला आहे.