Devendra Fadnavis On Ajit Pawar Death: अजित पवारांच्या निधनानंतर CM देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केल्या भावूक प्रतिक्रिया..
दमदार दिलदार मित्र सोडून गेला : CM देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या विमानाचा बारामती येथे मोठा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईमधून बारामतीमध्ये उतरताना अजित पवार यांचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. यात अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करत लोकनेता हरवल्याची भावना व्यक्त केली आहे. तसेच राज्यामध्ये आज शासकीय सुट्टीसह तीन दिवसांचा दुखवटाही जाहीर करण्यात आला आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
अजित पवार महाराष्ट्राचे लोकनेते होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेले, महाराष्ट्रातील प्रश्नांची जाण असलेला नेता होता. त्यांच्याबद्दल जनसमान्यांमध्ये प्रचंड मोठी आस्था होती. अजितदादा अतिशय संवेदनशील नेतृत्व होतं. सर्व परिस्थितीत न डगमगता पुढे जाणारं व्यक्तीमत्त्व होतं. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस हा अत्यंत कठिण दिवस आहे” अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या निधनानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या .”कारण अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात. आणि ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासात अतिशय महत्त्वपूर्ण योगदान ते देत होते, त्यावेळी त्यांचं जाणं धक्कादायक आणि अविश्वसनीय आहे. माझ्यासाठी वैयक्तिक दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“त्यांच्या कुटुंबावरही प्रचंड मोठा आघात आहे. मी आणि एकनाथ शिंदे आम्ही लवकरच बारामतीकडे निघणार आहोत. पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री यांच्यााशी चर्चा करून त्यांना परिस्थितीची कल्पना दिली आहे. त्यांनीही याबद्दल प्रचंड दु:ख व्यक्त केलं आहे. एकूणच देशातच या प्रकरणाने हळहळ पसरली आहे. पुढच्या सर्व गोष्टी त्या परिवाराशी चर्चा करून ठरवण्यात येतील. सकाळी सुप्रिया ताईंशी बोलणं झालं. त्यानंतर पार्थ पवारांशी बोलणं झालं. संपूर्ण परिवार बारामतीला गेल्यावर सर्व निर्णय त्यांच्या संमतीने घेतले जातील” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले
जी पोकळी तयार होते ती भरून काढणं अतिशय कठिण
“राज्यात आज शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. त्यासोबत तीन दिवसाचा दिखवटा जाहीर करण्यात आला आहे. कधीही भरून न निघणारं असं नुकसान आहे. महाराष्ट्रातून असे लोकनेते गेल्यावर जी पोकळी तयार होते ती भरून काढणं अतिशय कठिण आहे. अजितदादा गेले यावर विश्वास ठेवायलाच मन तयार होत नाही” असं मुख्यमंत्री म्हणाले. अजित पवार हे जनतेच्या प्रश्नांसाठी सतत कार्यरत असायचे. लोकांमध्ये त्यांचा वावर असायचा.