भारतीय बाजारावर आता‘एआय’चे ढग
सेन्सेक्स 1068 अंकांनी कोसळला: गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटींचे नुकसान
मुंबई :
चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी भारतीय भांडवली बाजारात मोठ्या घसरणीची नेंद झाली आहे. आशियाई बाजारातील घसरणीचे प्रतिबिंब मंगळवारच्या सत्रात भारतीय बाजारपेठेत दिसून आले, बेंचमार्क निर्देशांक 1 टक्क्यांहून अधिक घसरले. सुरुवातीच्या व्यवहारांपासून विक्रीचा दबाव बाजारामध्ये राहिला होता. दरम्यान मुख्य क्षेत्रांपैकी आयटी आणि अन्य काही क्षेत्रांमधील घसरणीमुळे बाजार नुकसानीसह बंद झाला आहे.
अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने शुल्कांवर स्थगिती दिल्यानंतर 15 टक्क्यांपर्यंतचे नवीन तात्पुरते शुल्क लादण्यात आले आहे. यापूर्वी, अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने हे शुल्क बेकायदेशीर घोषित केले होते. या निर्णयामुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये अनिश्चितता आणखी वाढली आहे. प्रमुख कंपन्यांमध्ये बीएसई सेन्सेक्स 83,079 अंकांवर स्थिर होत सुरु झाला. मात्र अंतिम सत्रात सेन्सेक्स 1068.74 अंकांनी घसरून 82,225.92 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा देखील 25,641 वर स्थिर होत उघडला खरा वर शेवटी 288.35 अंकांनी घसरुन निर्देशांक 25,424.65 वर बंद झाला आहे.
टेक महिंद्रा, एचसीएल टेक, इटर्नल, इन्फोसिस आणि टीसीएस हे सेन्सेक्समधील सर्वात नुकसानीतले समभाग होते. दरम्यान, एनटीपीसी, एचयूएल, पॉवर ग्रिड, टाटा स्टील आणि अदानी पोर्ट्स हे तेजीत होते. क्षेत्रीय आघाडीवर, मंगळवारी निफ्टी आयटी सर्वाधिक 4.7 टक्के घसरला. निफ्टी रिअल्टी 2.5 टक्के घसरला आणि निफ्टी मीडिया 1.3 टक्के घसरला. निफ्टी मिडकॅप 100 0.32 टक्के घसरला, तर निफ्टी स्मॉलकॅप 100 मंगळवारी 0.55 टक्के घसरला.
घसरणीची कारणे?
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी नवीन तात्पुरत्या शुल्काच्या घोषणेचा बाजाराच्या भावनेवर परिणाम झाला आहे. अहवाल असे दर्शवतात की 15 टक्क्यांपर्यंत नवीन तात्पुरते शुल्क लादण्यात आले आहे. दरम्यान, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने या शुल्कांना बेकायदेशीर घोषित केले, ज्यामुळे जागतिक व्यापाराबाबत अनिश्चितता आणखी वाढत आहे.
गुंतवणूकदारांना 3 लाख कोटींचे नुकसान
मंगळवारी बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांना जवळजवळ 3 लाख कोटींचे नुकसान झाले. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 46,581,314 कोटींवर घसरले, जे सोमवारी बाजार बंद होता तेव्हा 46,852,324 कोटी होते. परिणामी, गुंतवणूकदारांना 2.71 लाख कोटींचे नुकसान झाले.