ज्ञानवापी तलावाची स्वच्छता पूर्ण
वृत्तसंस्था / वाराणसी
वाराणसीच्या ज्ञानवापी तलावाची स्वच्छता पूर्ण करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने वाराणसीच्या जिल्हा प्रशासनाला ही स्वच्छता करण्याचे आदेश दिले होते. हिंदू पक्षकारांनी यासंबंधी याचिका सादर केली होती आणि मुस्लीम पक्षकारांनी या याचिकेला कोणताही आक्षेप घेतला नव्हता. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात हा आदेश दिला होता, अशी माहिती देण्यात आली आहे.
स्वच्छता कार्यक्रम होत असताना दोन्ही बाजूंचे पक्षकार आणि त्यांचे वकील उपस्थित होते. तसेच प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्थाही सुनिश्चित केली होती. मोठ्या प्रमाणात पोलिस नियुक्त करण्यात आले होते. अग्नीशामक दलाचे कर्मचारी आणि वाराणसी महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी येथे नियुक्त करण्यात आले होते. स्वच्छता कार्य सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी सुरु करण्यात आले. ते साधारणत: अडीच तास चालले होते. तीन पंपांच्या साहाय्याने तलावातील पाणी उपसण्यात आले. त्यानंतर तलावाची व्यवस्थित स्वच्छता करण्यात आली. नंतर तलावात स्वच्छ पाणी भरण्यात आले. तलावात अनेक मृत मासे सापडल्याची माहिती स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दिली. तलावातील पाणी उपसताना काही जिवंत मासेही धरण्यात आले होते. हे मासे स्थानिक प्रशासनाच्या संबंधित विभागाकडे सोपविण्यात आले, अशी माहिती दोन्ही बाजूंच्या वकीलांनी नंतर दिली.