स्वच्छ सर्वेक्षण पथक आज बेळगावात
तीन दिवस करणार सर्वेक्षण : महापालिकेची प्रतीक्षा संपुष्टात
बेळगाव : स्वच्छ सर्वेक्षणासाठी येणारे केंद्रीय पथक अखेर आज शनिवारी बेळगावला येणार असल्याचे निश्चित झाले आहे. शुक्रवारी सदर पथक शिमोग्याहून बेळगावला येण्यास निघाले असून याबाबतची माहिती बेळगाव महानगरपालिकेला देण्यात आली आहे. आज सकाळपर्यंत पथक बेळगावात दाखल होण्याची शक्यता असून गेल्या आठ दिवसांपासून महापालिकेचे अधिकारी या पथकाच्या प्रतीक्षेत होते. दरवर्षी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार केंद्रीय पथकाकडून विविध राज्यातील महापालिकांचे सर्वेक्षण केले जाते. गतवर्षी जानेवारी-2024 मध्ये जाहीर झालेल्या सर्वेक्षणात बेळगाव शहर 198 व्या क्रमांकावर होते. स्वच्छ शहरांमध्ये बेळगावची घसरण झाली होती. मात्र, यंदा बेळगाव मनपाकडून कचरा वर्गीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. 80 टक्के कचऱ्याचे वर्गीकरण होत असून त्या माध्यमातून दरमहा 10 लाखांची बचत होत आहे.
व्यवस्थितरित्या कचऱ्याचे व्यवस्थापन झाल्याने स्वच्छ सर्वेक्षणात चांगले स्थान मिळेल, अशी अपेक्षा मनपाच्या अधिकाऱ्यांना आहे. 2025 सालासाठी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आठ दिवसांपूर्वी पथक सर्वेक्षणासाठी बेळगावला येणार होते. याबाबतची माहिती महापालिकेला दिली होती. हे पथक पाच दिवस बेळगावात सर्वेक्षण करणार होते. त्यामुळे महापालिकेकडून त्यांच्या राहण्याची सोयही करण्यात आली होती. मात्र, सदर पथक अन्य जिल्ह्यात गेल्याने त्यांना विलंब झाला. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून या पथकाच्या प्रतीक्षेत मनपाचे अधिकारी होते. शिमोगा जिल्ह्यातील स्वच्छ सर्वेक्षण संपल्यानंतर पथक बेळगावला येण्यासाठी निघाले आहे. पथकामध्ये पाच ते सहा अधिकाऱ्यांचा समावेश असून तीन दिवस पथक बेळगावात वास्तव्य करून सर्व्हे करणार आहे. त्यांच्या राहण्याची सोय शासकीय विश्रामगृहात करण्यात येणार आहे.