शहरातील रस्ते तीन महिन्यात सुस्थितीत आणणार
कोल्हापूर :
शहरात दोन वेळा आलेल्या महापुरामुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली. शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शासनामार्फत कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शहरवासियांसह, पर्यटक, भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी शहरातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्य देणार आहे. पुढील तीन महिन्यात शहरातील रस्ते सुस्थितीत आणणार असल्याची ग्वाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.
आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी रस्ता पेव्हर पद्धतीने डांबरीकरण करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती जिल्हा वार्षिक योजनेतून 1 कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्याच्या कामास शुक्रवारी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
आमदार क्षीरसागर म्हणाले, गेल्या काही वर्षातील नैसर्गिक आपत्तीमुळे शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली होती. शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून 100 कोटींचा निधी यापूर्वी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून शहरातील रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. यासह शहरातील इतर प्रमुख मार्गही सुस्थितीत यावेत यासाठी प्राधान्य दिले जात आहे. बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी हा शहरातील प्रमुख मार्ग असून, यासाठी 1 कोटी 25 लाखांचा निधी प्रस्तावित करण्यात आला असून येत्या काही महिन्यात हा रस्ता रहदारीसाठी दर्जेदार झालेला दिसून येईल. त्याचबरोबर शहरातील इतर प्रमुख मार्गही येत्या तीन महिन्यात सुस्थितीत आणण्याचा आपला प्रयत्न राहील, असे आश्वासन आमदार क्षीरसागर यांनी दिले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, किरण नकाते, बाबा पार्टे, सराफ संघाचे कुलदीप गायकवाड, हिंदुत्ववादी संघटनेचे शाम जोशी, राजू मेवेकरी, इंद्रजीत आडगुळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, रमेश खाडे, दीपक चव्हाण, किशोर घाटगे, सुनील जाधव आदी उपस्थित होते.