शहर भाजपकडून राज्य सरकारचा निषेध
बेळगाव : आरसीबी संघाने तब्बल 18 वर्षांनी आयपीएल चषक पटकाविला. यानंतर बेंगळुरात झालेल्या विजयोत्सवाला गालबोट लागल्याने चेंगराचेंगरीत 11 जणांना आपल्या जीवाला मुकावे लागले. नियोजन न करता विजयोत्सव काढण्यात आल्याने ही दुर्दैवी घटना घडली आहे. याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असून तात्काळ मुख्यमंत्र्यांनी आपली चूक मान्य करून राजीनामा देण्याची मागणी बेळगाव शहर भाजपच्यावतीने करण्यात आली. दरम्यान राणी चन्नमा सर्कलमध्ये घोषणाबाजी करत उपमुख्यमंत्री, गृहमंत्री व राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. विधानसौध येथे आपल्या कुटुंबासह राज्यकर्ते विजेत्या संघाबरोबर फोटो काढण्यात मग्न होते. यावेळी त्यांच्याभोवती मोठा फौजफाटा तैनात होता. मात्र विजयोत्सवात आलेल्या सार्वजनिकांच्या सुरक्षेसाठी नियोजन करण्यात आले नाही. आपली चूक लपविण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. दिशाभूल करण्यासाठी राज्य सरकार अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांना वेठीस धरत आहे, याचाही आम्ही निषेध करत असल्याचे भाजप कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी रमेश देशपांडे, इरय्या खोत, प्रसाद देवरमनी, शिल्पा केकरे, विजय खोडगनूर, विनोद लंगोटी, उज्ज्वला बडवाण्णाचे यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.