महाशिवरात्रीसाठी नागरिकांची बाजारात वर्दळ
फळा-फुलांबरोबर बेलपत्राची खरेदी : उपवासाच्या पदार्थांचीही रेलचेल
बेळगाव : महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती. विशेषत: फळा-फुलांबरोबर उपवासाच्या पदार्थांची मागणी वाढली होती. सायंकाळी गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली यासह इतर ठिकाणी ग्राहकांची रेलचेल पहावयास मिळाली. बाजारात फळा-फुलांबरोबर साबुदाणे, वरी तांदूळ, खजूर, राजगिरा लाडू आणि इतर उपवासाच्या पदार्थांना मागणी अधिक होती. त्याबरोबर बाजारात फळांची विक्रीही मोठ्या प्रमाणात झाली. अननस 80 रु. एक, पेरू 80 ते 100 रु. किलो, चिकू 100 रु. किलो, संत्री 80 ते 100 रु. किलो, सफरचंद 160 ते 240 रु. किलो, केळी 50 ते 60 रु. डझन, द्राक्षे 60 रु. किलो असा फळांचा दर होता. त्याबरोबर पाच फळांनाही मागणी अधिक होती. 60 ते 100 रुपयांनी त्याची विक्री सुरू होती. बाजारात साबुदाणा 80 रु. किलो, वरी तांदूळ 120 रु., खजूर 120 रु. किलो, राजगिरा लाडू 25 रु. पाकिट असा दर पहावयास मिळाला. महाशिवरात्रीनिमित्त नागरिक शिवालयांमध्ये जाऊन दर्शन घेणार आहेत. यासाठी गुरुवारी किरकोळ फुले व हारांची मागणीही वाढली होती. 20 ते 40 रुपयेप्रमाणे विक्री झाली. त्याबरोबर सुट्या फुलांनाही पसंती मिळाली. विशेषत: बेलपत्रे विक्रीसाठी दाखल झाली होती. महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला बाजारात बहर आल्याचे चित्र पहावयास मिळाले.
धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
महाशिवरात्रीच्या निमित्ताने शुक्रवारी शिवमंदिरातून दर्शनासाठी गर्दी होणार आहे. त्याबरोबर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बाजारात पूजेच्या साहित्यासाठी नागरिकांची वर्दळ वाढली होती.