सरकारी योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
म्हापसा : केंद्र सरकारने लोकांच्या हितार्थ सुरू केलेल्या विविध योजनांचा लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. हळदोणा मतदारसंघातील उसकई-पुनोळा- पालयें पंचायत क्षेत्रातील संपन्न झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमावेळी आपले मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष राज्यसभेचे खासदार सदानंद तानावडे, माजी आमदार ग्लेन टिकलो, उपसरपंच रिया मयेकर इतर पंच सदस्य, सरकारच्या विविध खात्यातील अधिकारी यावेळी उपस्थित होते. सरकारच्या विविध योजनांवर मोठ्या प्रमाणात जागृती केली जाते. ज्यांना या योजनांचा लाभ मिळालेला नाही त्यांच्यापर्यंत अशा योजना पोहचवण्याचा प्रयत्न या संकल्प यात्रेतून केला जातो. पंतप्रधान विमा योजना, उज्वला योजना, आवास योजना, स्वामीत्व योजना तसेच इतर योजनांचा लाभ लोकांनी घ्यावा. अशा प्रकारच्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांना याचा नक्कीच लाभ होणार असाही विश्वास मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केला. याप्रंसगी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी बोलताना केंद्र सरकारने आपल्या विविध योजनातून लोकांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती दिली. एखादा लाभार्थी मागे राहिल्यास त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या सहकार्यातून लाभ घ्यावा, अशीही सूचना नाईक यांनी केली. देशाचा विकास हा सामान्य लोकांच्या विकासावर अवलंबून असून सामान्य लोक जेव्हा योजनांचा लाभ घेईल, तेव्हाच देश विकसित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सदानंद तानावडे यांनी आपले विचार मांडले. 2014 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात केलेल्या विकासाची, तयार केलेल्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवणे हा असल्याचे सांगितले. गोव्यात ही यात्रा पूर्ण यशस्वी झाल्याचाही दावा त्यांनी केला. सुरुवीला या यात्रेचे स्वागत श्रीपाद नाईक व तानावडे यांनी केले.