भारतीयांच्या जागी ‘चिनी’ नाही येणार
मालदीवच्या आगामी अध्यक्षांचा शपथविधीपूर्वी दावा
वृत्तसंस्था/ माले
मोहम्मद मोइज्जू यांनी मालदीवच्या अध्यक्षपदाची शपथ घेण्यापूर्वी भारतीय सैनिकांना देश सोडावाच लागणार असल्याचा पुनरुच्चार केला आहे. परंतु मोइज्जू यांनी भारतीय सैनिकांचे स्थान चिनी सैनिक घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. चीनधार्जिणे असल्याचा आरोप त्यांनी नाकारला आहे. मोइज्जू यांच्या शासनकाळात मालदीव आणि भारताचे संबंध तणावपूर्ण राहण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त होत आहे.
भारतीय सैनिकांनी आमच्या देशातून निघून जावे, जेणेकरून अन्य कुठल्याही देशाला स्वत:च्या सैन्यतुकड्या येथे आणण्यासाठी स्थान मिळावे असे माझे म्हणणे नाही. मी केवळ मालदीवचा समर्थक आहे. चीन किंवा अन्य कुठल्याही देशाला भारतीय सैनिकांची जागा घेण्याची अनुमती देणार नसल्याचा दावा मोइज्जू यांनी केला आहे.
मोइज्जू यांनी हिंदी महासागर बेटसमुहातील प्रतिस्पर्धेबद्दल बोलताना मालदीव या स्पर्धेत उतरण्याकरता अत्यंत छोटा देश असल्याचे म्हटले आहे. अशा स्थितीत मालदीवच्या विदेश धोरणात हिंदी महासागरातील प्रतिस्पर्धेला सामील करण्यास मला कुठलेच विशेष स्वारस्य नाही. आम्ही भारत आणि चीन तसेच अन्य सर्व देशांसोबत मिळून काम करणार आहोत. आम्ही मालदीवच्या प्रगतीसाठी सर्वांसोबत मिळून वाटचाल करण्याचा निर्णय घेतला असल्याचे उद्गार मोइज्जू यांनी काढले आहेत.
भारताशी करणार चर्चा
50-75 भारतीय सैनिकांना मायदेशी परत पाठविण्याचा मुद्दा संवेदनशील आहे. यामुळे यावर भारतासोबत औपचारिक चर्चा लवकर सुरू होण्याची अपेक्षा आहे. ही चर्चा लवकरच होईल कारण मालदीवच्या लोकांनी कुठल्याही विदेशी सैन्याच्या उपस्थितीला अनुमती न देण्यासाठी मला मतदान केले आहे. याचमुळे या सैनिकांना हटविण्यासाठी आम्ही भारत सरकारसोबत चर्चा करत आहोत. आम्ही शांततापूर्ण आणि लोकशाहीच्या मार्गाने असे करू शकतो असा मला विश्वास आहे. मालदीवला त्याच्या विशाल सागरी क्षेत्रात गस्तकार्यासाठी देण्यात आलेल्या तिन्ही विमानांना संचालित करण्यासाठी तैनात भारतीय सैनिकांच्या तुकडीला हटविणे हे आमचे काम असल्याचे मोइज्जू यांनी म्हटले आहे.
भौगोलिक स्थान महत्त्वपूर्ण
दक्षिण आशियात स्वत:चे जुने सागरी किनारे आणि उत्तम रिसॉर्ट्सची ओळखला जाणारा मालदीव हा देश एक जियोपॉलिटिकल हॉटस्पॉट ठरला आहे. जागतिक पूर्व-पश्चिम सागरी व्यापारी मार्ग या देशाच्या 1,92 छोट्या बेटांच्या साखळीमधून जातो. हिंदी महासागराच्या एका मोठ्या हिस्स्यावर नजर ठेवण्यासाठी मालदीव सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असल्याचे भारत आणि चीन तेथे स्वत:चा प्रभाव राखू पाहत आहेत. 2018 मध्ये मालदीवमध्ये सत्तेवर आलेले इब्राहिम सालेह यांनी भारतासोबतच्या संबंधांना महत्त्व दिले होते. परंतु आता नवे अध्यक्ष मोइज्जू यांनी इब्राहिम सालेह यांच्या प्रथम भारत धोरणाला मालदीवसाठी धोकादायक ठरविले आहे. मोइज्जू हे चीनसोबत संबंध घनिष्ठ करु पाहत आहेत. चीनधार्जिणे नेते अशी त्यांची मालदीवमध्ये ओळख आहे.