शेतीरस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याचे चिंचलीतील शेतकऱ्यांचे निवेदन
बेळगाव : चिंचली ता. रायबाग येथील एका जमीनमालकाने रस्त्यावर अतिक्रमण केल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. यासंबंधी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून अतिक्रमणाबद्दल विचारणा करणाऱ्यांना धमकावण्यात येत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. भीमा तुळजण्णावर, शिवानंद पडदाळे, संजू मनगिनी,विठ्ठल हेगडे आदी शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. चिंचली येथील हालाप्पा या शेतकऱ्याने रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. गेल्या 80 वर्षांपासूनच्या वहिवाटी रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे शाळकरी मुले, अन्य शेतकऱ्यांना त्रास होतो आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. परिसरातील 500 एकर शेतजमिनीला जाण्यासाठी 112 शेतकऱ्यांनी 6 फूट रस्ता सोडला आहे. संबंधितांना वारंवार विनंती करूनही अतिक्रमण हटवले नाही. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. 6 फुटाचे अतिक्रमण हटवून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.