चीन सीमेवर निर्माण करतोय सुविधांचे जाळे : वायुदल प्रमुख
भारताकडूनही पायाभूत सुविधांच्या निर्मितीला वेग
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि चीनदरम्यान सीमा वादावरून वायुदलप्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी. सिंह यांनी शुक्रवारी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पायाभूत सुविधांची निर्मिती जलदपणे करत आहे. भारत देखील पायाभूत सुविधांचा विकास घडवून आणत आहे. कुठल्याही भावी सुरक्षा आव्हानाला सामोरे जाण्यासाठी स्वदेशी शस्त्रास्त्र प्रणाली असणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
एस-400 क्षेपणास्त्र प्रणालींच्या 3 युनिट्सचा पुरवठा झाला आहे. रशियाने पुढील वर्षापर्यंत उर्वरित 2 युनिट्स उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले आहे. 2047 पर्यंत भारतीय वायुदलाची पूर्ण सामग्री भारतातच निर्माण व्हायला हवी असे म्हणत वायुदल प्रमुखांनी संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेवर जोर दिला आहे.
आमच्याकडे विदेशी भूमीवरील स्वत:च्या शत्रूंवर हल्ला करण्याची पूर्ण क्षमता आहे. आम्ही बालाकोट एअर स्ट्राइकद्वारे हे दाखवूनही दिले असल्याचे सिंह यांनी म्हटले आहे. अग्निवीर योजनेसंबंधीची आमची प्रतिक्रिया अत्यंत सकारात्मक आहे. आम्हाला 25 टक्क्यांपेक्षा अधिक अग्निवीरांना सेवेत ठेवले जाऊ शकते का अशी विचारणा झाली होती आणि याच्या उत्तरादाखल आम्ही असे करू शकतो असे सांगितले आहे. यासंबंधी निर्णय सरकारला घ्यावा लागणार असल्याचे वायुदल प्रमुखांनी नमूद पेले आहे.
एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह यांनी मागीलमहिन्यात वायुदल प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला होता. त्यांनी व्ही.आर. चौधरी यांची जागा घेतली आहे. सिंह यांना 5 हजार तासांपेक्षा अधिक काळापर्यंतचा विमानो•ाणाचा अनुभव आहे. तसेच ते लढाऊ विमानाचे कुशल वैमानिक आहेत.