वेगाने वृद्ध होतोय चीन
विवाह करण्यास लोकांची टाळाटाळ : एका वर्षात 40 लाखाने घटली लोकसंख्या
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनमध्ये लोकसंख्या संकट सातत्याने तीव्र होत चालले आहे. शासकीय आकडेवारीनुसार 2025 मध्ये देशाची लोकसंख्या सुमारे 40 लाखांनी (33.9 लाख) कमी होत 140.5 कोटी राहिली आहे. ही घसरण 2024 च्या तुलनेत अधिक वेगवान असून सलग चौथ्या वर्षी चीनच्या लोकसंख्यात घट नेंदली गेली आहे. चीनच्या राष्ट्रीय सांख्यिकी ब्युरोने (एनबीएस) सोमवारी ही आकडेवारी जारी केली असून याच्या माध्यमातून चीन वेगाने वृद्ध होत असल्याचे आणि लोक विवाह करण्यास टाळाटाळ करत असल्याचे स्पष्ट होते.
अहवालानुसार 2025 मध्ये एकूण जन्मांची संख्या कमी होत 79.2 लाख राहिली आहे. तर 2024 मध्ये हेप dरमाण 95.4 लाख राहिले होते. यामुळे ही घसरण 17 टक्के ठरली आहे. याचबरोबर चीनचा जन्मदर कमी होत 1 हजार लोकांमागे 5.63 राहिला आहे. हे प्रमाण आतापर्यंतचे नीचांकी आहे. तज्ञांनुसार हा आकडा चीनच्या इतिहासात अत्यंत चिंताजनक मानला जात आहे.
2025 मध्ये नेंद जन्मांचे प्रमाण हे जवळपास 1738 सालच्या स्तरासमान आहे. तेव्हा चीनची लोकसंख्या केवळ 15 कोटीच्या आसपास होती. तर 2025 मध्ये मृत्यूंचे प्रमाण वाढून 1.13 कोटीवर पोहोचले आहे. तर 2024 साली हे प्रमाण 1.09 कोटी राहिले होते. चीनचा मृत्यूदर 1 हजार लोकांमागे 8.04 राहिला असून 1968 नंतरचे हे सर्वाधिक प्रमाण आहे.
चीनची लोकसंख्या 2022 पासून सातत्याने घटत असून देश वेगाने वृद्ध लोकसंख्येच्या दिशेने जात आहे. एनबीएसच्या अनुमानानुसार चीनच्या एकूण लोकसंख्येचा सुमारे 23 टक्के हिस्सा 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांचा आहे. 2035 पर्यंत ही संख्या 40 कोटीपर्यंत पोहोचेल, असा अनुमान असून हे प्रमाण अमेरिका आणि इटलीच्या एकूण लोकसंख्येइतके असणार आहे.
या स्थितीचा प्रभाव चीनच्या अर्थव्यवस्थेवरही पडत आहे. कार्यबळातून मोठ्या संख्येत लोक बाहेर पडत आहेत, तर पेन्शन आणि सामाजिक सुरक्षा बजेटवरील ताण वाढत चालला आहे. याचमुळे चीनने निवृत्तीवय वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आता पुरुषांना 63 वर्षे तर महिलांना 58 वर्षांपर्यंत काम करावे लागणरा आहे. एक मूल धोरणाचे मोठे सावट, घटते विवाह आणि जीवनशैलीत बदल ही चीनच्या लोकसंख्या घसरणीची मोठी कारणे असल्याचे तज्ञांचे सांगणे आहे. परंतु विवाह नोंदणी नियम शिथिल केल्याने भविष्यात जन्मदराप्रकरणी काहीसा दिलासा मिळू शकतो अशी अपेक्षा सरकारला आहे. चीनमध्ये लोक आर्थिक संकटांमुळे विवाह करत नसून राहणीमानाचा खर्च वाढल्याने विवाह करण्यास घाबरत असल्याचेही मानले जाते.