चिकोडीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचीच हवा
जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी : गॅरंटी योजना थांबविल्या जाणार नाहीत
बेळगाव : राज्यामध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची हवा असून पंतप्रधान मोदी यांची हवा नाही. मोदी यांच्या दहा वर्षांतील वैफल्यामुळे जनता कंटाळली आहे. त्यामुळेच नागरिकांनी काँग्रेसला पाठिंबा दर्शविला आहे. चिकोडी लोकसभा मतदारसंघात काही झाले तरी उमेदवाराविरोधात उमेदवार अशीच लढत आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. यमकनमर्डी येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. राज्यामध्ये काँग्रेस सरकारकडून अनेक जनहिताच्या योजना राबविण्यात आल्या आहेत. त्यामुळेच काँग्रेस पक्ष जनतेच्या मनात रुजला आहे. चिकोडी लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचीच हवा आहे. चिकोडी मतदारसंघातून निवडून आलेल्या भाजप खासदारांनी कोणतीच विकासकामे केली नाहीत. त्यामुळे यावेळी या मतदारसंघातून प्रियांका जारकीहोळी यांना मतदारांनी अधिक पसंती दिली आहे. त्या अधिक मताधिक्क्याने निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या 20 दिवसांपासून चिकोडी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघानुसार प्रचार केला आहे. दुसऱ्या टप्प्यातील प्रचार सुरू असून तो टप्प्याटप्याने पूर्ण करण्यात येईल. निवडणुकीनंतर गॅरंटी योजना बंद केल्या जातील, अशा खोट्या अफवा भाजपकडून उठविल्या जात आहेत. आपल्या पक्षाची प्रगती आणि सामाजिक बांधिलकी पाहून भाजपकडून अशा प्रकारे प्रचार केला जात आहे. सुरू करण्यात आलेल्या गॅरंटी योजना कोणत्याही कारणास्तव थांबविल्या जाणार नाहीत, असे मंत्री जारकीहोळी यांनी सांगितले.
नेहा हत्या प्रकरणाचा राजकारणासाठी उपयोग करणे योग्य नाही
राज्यामध्ये आपला पक्ष सत्येवर येण्यापूर्वी भाजप कार्यकाळातही अशा अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, त्याबाबत भाजप एकदाही बोलत नाही. आता नेहा हत्या प्रकरणाचे राजकारण केले जात आहे, हे योग्य नाही. नेहा हत्या प्रकरण वैयक्तिक आहे. पोलीस खात्याकडून याची संपूर्ण चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.