मुख्यमंत्री पुन्हा लागले कामाला!
ठणठणीत असल्याचे सांगत घेतला जनता दरबार
डिचोली : खरा लोकनेता हा लोकांपासून व लोकांच्या भावनांपासून दूर कधीच राहू शकत नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल रविवारी रवींद्र भवनमध्ये सकाळी दाखल होऊन तेथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये रममाण होऊन जनता दरबार घेतला. या अनपेक्षित क्षणामुळे तेथे उपस्थित असलेल्या सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. जनता व आपल्यामध्ये कधीही अंतर न ठेवता सदैव लोकांमध्ये मिसळून व लोकांचेच होऊन वागणाऱ्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुन्हा एकदा आपण जनतेचाच व लोकांचाच नेता, सामान्य मुख्यमंत्री असल्याचे दाखवून दिले. गुढीपाडव्याच्या दिवसापासून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या आरोग्याबद्दल विविध माहितीसमोर येत होती.
पुणे येथे इस्पितळात स्वत:ची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यासाठी गेलेल्या मुख्यमंत्र्यांबद्दल प्रसार माध्यमांमधून विविध बातम्या समोर येत होत्या. आपले आरोग्य तंदुऊस्त असून सर्व रिपोर्टस् नॉर्मल असल्याचे त्यांनी व्हिडिओद्वारे जाहीर केले. कोणतीही चिंता करण्याची आवश्यकता नसल्याचेही सांगितले. हे सर्व झाल्यानंतरही काल रविवारी सकाळी ते रवींद्र भवन येथे दाखल झाले. ते येणार असल्याची कुणकुण काहींना आधीच होती. त्यामुळे लोकांनी रवींद्र भवनमध्ये उपस्थिती लावली होती. ते दाखल होताच त्यांच्या भोवतीच्या लोकांनी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या पोलिस संरक्षण पथकाने मुख्यमंत्र्यांभोवती कडे केले. मात्र मुख्यमंत्र्यांनीच त्यांना लोकांना आपल्याकडे येण्यापासून रोखू नये, अशी सूचना केली.
लोकांनी त्यांच्याशी हस्तांदोलन करत त्यांच्या तब्येतीची माहिती घेतली. आपणास काहीही झाले नसून आपण ठिकठाक आहे. चिंता करण्याची कोणतीही आवश्यकता नाही, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी लोकांना स्पष्ट केले आणि रवींद्र भवनच्या कॉन्फरन्स कक्षात निघून गेले. तेथील काम आटोपल्यानंतर मुख्यमंत्री पुन्हा मुख्य सभागृहात जाण्यासाठी आले असता नियमित जनता दरबार भरण्याच्या ठिकाणी पोहोचले. तेथे लोकांनी त्यांना पुन्हा गराडा घालून आपल्या व्यथा सांगण्यास सुऊवात केली. लोकांना पाहताच मुख्यमंत्र्यांनी थेट ‘टेबल लावले आहे का?’ असे विचारत जनता दरबारसाठी ते बसणाऱ्या टेबलजवळ गेले. यावेळी आपल्या कर्मचाऱ्यांना लोकांच्या समस्यांसंबंधी त्यांनी आवश्यक सूचना व सल्लेही दिले. जनता दरबारानंतर त्यांनी रवींद्र भवनच्या मुख्य सभागृहात सुरू असलेल्या राज्य अर्थसंकल्पावरील विनिमय कार्यक्रमातही ते सहभागी झाले.