चिकन-मटण दुकाने सरकारच्या रडावर
मगरीची संख्या वाढण्याचेही कारण : वनमंत्री विश्वजित राणे यांची माहिती
पणजी : मगरींची भरमसाठ वाढणारी संख्या हा सध्या गंभीर चिंतेचा विषय बनला असून यामागील कारणे शोधून काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यात फोफावलेल्या चिकन/मटण सेंटरचे जळीस्थळी उघड्यावरच फेकण्यात येणारे टाकाऊ भाग सरकारच्या रडारवर आले आहेत. अशाप्रकारे उघड्यावर शिल्लक चिकन, मटण किंवा तत्सम पदार्थ फेकताना आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वनमंत्री विश्वजित राणे यांनी दिला आहे. सातोण-दाभाळ परिसरात मंगळवारी एक स्थानिक महिला दूधसागर नदीवर कपडे धुण्यासाठी गेली असता दोन मगरींनी तिच्यावर हल्ला केला. मात्र केवळ दैव बलवत्तर म्हणूनच ती या हल्ल्यातून बचावली आहे. या दुर्घटनेवरून मगरींच्या वाढत्या संख्येबाबत चिंतेची तीव्रता अधिक गहन बनली आहे. त्यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे मंत्री राणे यांनी पुढे सांगितले.
मंगळवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्य वनसंरक्षकांसह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यात गल्लीगल्लीत चिकन-मटण सेंटर फोफावले असून त्यांच्याकडून तेथील शिल्लक, मांस-मटणचे तुकडे रात्रीच्या अंधारात गुपचूपरित्या उघड्यावर किंवा नाले, ओहोळात, निर्जनस्थळी, खाजनशेतील फेकण्यात येतात. मगरींच्या वाढत्या संख्येमागे हेही एक कारण असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे सर्व चिकन/मटण सेंटरवर करडी नजर ठेवण्यात येणार असून असे कृत्य करताना आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राणे यांनी दिला.
बेडकांची शिकार कराल तर खबरदार
राज्यात गेल्या काही वर्षांपासून ‘जंपिंग चिकन’ अर्थात बेडकांची शिकार करण्याचेही प्रकार वाढीस लागले असून वनखात्यातर्फे बेडूक बचाव मोहीम राबविण्यात येणार असल्याचे वनमंत्र्यांनी सांगितले. त्यासाठी बेडकांची सर्वाधिक उत्पत्ती होणाऱ्या स्थळांचा शोध घेण्यात येणार असून त्यावर वनखात्याकडून करडी नजर ठेवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
‘व्हर्टिकल फॉरेस्ट’ला देणार प्रोत्साहन
यापुढे राज्यात ‘व्हर्टिकल फॉरेस्ट’ संकल्पनेवर इमारती बांधण्यासाठी विकासकांना प्रोत्साहित करण्यात येईल. किंबहुना तसा कायदाच करण्यात येणार आहे. हे व्हर्टिकल फॉरेस्ट म्हणजे इमारत किंवा सदनिकेच्या बाल्कनीत केवळ कुंड्या ठेवल्या म्हणजे काम संपले, अशा मानसिकतेवर नसेल. तर त्यातून हरित इमारत आणि शाश्वत पर्यावरण यांचा संगम घडविण्याचे प्रयत्न असतील, असे राणे यांनी सांगितले.
वाघेरी डोंगर अभयारण्याचा भाग
अन्य एका प्रश्नावर बोलताना राणे यांनी लवकरच वाघेरी डोंगराचा समावेश वन्यजीव अभयारण्यात करण्यात येणार असल्याचे सांगितले. सध्या या विषयावर चर्चा सुरू आहे. त्याव्यतिरिक्त राज्यातील सर्व वखारींचे ऑडिट करण्याचाही निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, तत्पूर्वी वरिष्ठ वनाधिकाऱ्यांशी घेतलेल्या बैठकीत वनमंत्री राणे यांनी 480 खाजगी वनक्षेत्रांची प्रलंबित असलेली पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश त्यांना दिले. हा अहवाल सादर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्याचबरोबर सरकाने 3550 खारफुटी राखीव क्षेत्र जाहीर करण्याचा निर्णय घेतला असून त्याची तपासणी करण्याचे काम सध्या सुरू आहे, अशी माहिती वनमंत्र्यांनी दिली.