Cultural Kolhapur: छत्रपती चौथे शिवाजी महाराज बलिदान स्मारक शिवाजी पूल, काय सांगतो इतिहास?
ब्रिटिश सरकारने करवीर संस्थानच्या छत्रपतीपदी निवड करण्याचा निर्णय घेतला
By : सौरभ मुजुमदार
कोल्हापूर : 5 एप्रिल 1866 रोजी सावर्डेकर भोसले घराण्यात एक कर्तृत्ववान सुपुत्र जन्मास आला. अफाट बौद्धिक क्षमता, सोबत शारीरिक सुदृढता. यामुळे ब्रिटिश सरकारने त्याची करवीर संस्थानच्या छत्रपतीपदी निवड करण्याचा निर्णय घेतला.
विजयादशमीच्या सुमुहूर्तावर 23 ऑक्टोबर 1871 रोजी नारायण दिनकरराव भोसले सावर्डेकर घराणे या सुपुत्राला ‘करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज’ म्हणून नामाभिधान मिळाले. अत्यंत राजेशाही थाटात हा समारंभ पार पडला. 1873 ला मुंबई येथे व्हॉइस रॉयच्या विशेष दरबारात इंग्रजी भाषेवर अफाट प्रभुत्व असणाऱ्या या छत्रपतींना आपल्या राज्याबद्दल बोलण्याची प्रचंड इच्छा होती परंतु ब्रिटिश सरकारने ती नाकारली.
नेमकी हीच गोष्ट छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या मनात ब्रिटिश सरकार विरुद्धची ठिणगी म्हणून पेटून उठली. जानेवारी 1877 याच छत्रपतींना महाराणी व्हिक्टोरियाने कैसर- ए- हिंद हा सर्वोच्च किताब धारण करण्याच्या कार्यक्रमासाठी विशेष आमंत्रित केलेले होते. परंतु ब्रिटिश सरकारचा यापूर्वीचा ढोंगीपणा, राज्यात असणारी दुष्काळजन्य परिस्थिती यामुळे या छत्रपतींनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणे योग्य वाटले नाही.
एप्रिल 1879 मध्ये राजकोटच्या प्रिन्स कॉलेजमधून हे छत्रपती करवीर संस्थानात परत आले ते क्रांतिकारक विचार घेऊनच. आपले संस्थान, सार्वभौमत्व ,व छत्रपतींसारखे बहुमूल्य पद ब्रिटिशांसमोर वाकणे त्यांना कदापी मान्य नव्हते. याच कारणामुळे पुढे त्यांना ब्रिटिश सरकारची सक्त कैद सुरू होऊन त्यांच्या अंतिम पर्वाची सुरुवात झाली.
जनतेच्या मनातील या प्रिय राजास सहजासहजी हटविणे शक्य नाही, हे ब्रिटिशांनी ओळखून होते. त्यांची मनस्थिती ठीक नाही. त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी हवाबदल करणे गरजेचे आहे, असे सांगून एक महत्त्वपूर्ण योजना आखली. ज्याच्या विरोधात अनेक वृत्तपत्रांनी ब्रिटिशांच्या विरोधात आवाज उठविला.
अखेर पुणे येथून 19 जून 1882 ला करवीरच्या या लाडक्या, धाडसी व अत्यंत हुशार अशा या छत्रपतींना नगरच्या भुईकोट किल्ल्यात कडक बंदोबस्तात हलविण्यात आले. याच किल्ल्यामध्ये त्यांचा अमानुष्य छळ करण्यात आला. त्यांना मरणप्राय यातना दिल्या. अखेर त्यामध्येच 25 डिसेंबर 1883 रोजी छत्रपतींची प्राणज्योत मालविली. त्यांची रक्षा मात्र कोल्हापूरमध्ये आणून मिरवणुकीने याच पंचगंगा नदीत विसर्जन केली.
त्यांच्या हौतात्म्याचे स्फूर्तीस्थान शिवाजी पूल
पश्चिम भागासाठी व कोकणातील दळणवळणासाठी सुलभता यावी, यासाठी याच छत्रपतींनी इ.स. 1878 मध्ये पंचगंगा नदीवर एक भक्कम पूल बांधला. सुमारे चार वर्षे चाललेल्या या पुलाच्या बांधकामाला करवीर संस्थानच्या दरबारमार्फत या छत्रपतींच्या सन्मानार्थ ‘शिवाजी पूल’ असे नामकरण करण्यात आले.
ज्या छत्रपतींनी ब्रिटिशांविरोधात आवाज उठविला, अत्यंत धाडसी कामगिरी केली. अखेरीस त्यांना बलिदान द्यावे लागले. अशा लाडक्या छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या मौल्यवान स्मृती जपणारी शिवाजी पूल हीच एकमेव वास्तू आहे. अशीच नोंद आजही या पुलावर आहे.
दळणवळणाचे साधन म्हणून ज्या पूलाचा वापर केला तो सध्या बंद झाल्यामुळे ही वास्तू दुर्लक्षित झाली आहे. त्यावरच्या कोनशीलाही शेवटची घटका मोजत आहेत. ज्या नवीन बांधकाम व रस्त्यामध्ये पूर्णपणे झाकून जात आहेत, हे दुर्दैव म्हणावे लागेल. आपल्या प्रजेसाठी छत्रपतींनी दिलेल्या बलिदानाच्या स्मृती आपणच या ‘शिवाजी पूल’ वास्तूचे संरक्षण व संवर्धन करून जपल्या पाहिजेत. हीच त्यांना आदरांजली ठरेल.