चित्ता प्रकल्पाला दोन वर्षे पूर्ण !
केनियाकडून आणखी चित्ते पाठविण्याच्या अनुमतीची प्रतीक्षा
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताच्या वनांमध्ये पुन्हा चित्ता हा आकर्षक प्राणी दिसू लागावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने प्रारंभ करण्यात आलेल्या चित्ता प्रकल्पाला 2 वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. भारतात पूर्वी मोठ्या प्रमाणात ‘भारतीय चित्ता’ या प्राण्याचे अस्तित्व होते. तथापि, प्रचंड प्रमाणात शिकार आणि धनिकांच्या चित्तापालनाच्या षोकामुळे साधारणत: 1940 मध्ये, म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व काळातच हा प्राणी नामशेष झाला. चित्ता हा वनांचे वैभव समजला जातो.
त्यानंतर पुढची अनेक दशके चित्ता हा विस्मरणात गेला होता. तथापि, 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर चित्त्याचा वावर पुन्हा भारतीय वनांमध्ये व्हावा यासाठी त्यांच्याच पुढाकाराने योजना सज्ज करण्यात आली. मात्र, भारतात चित्ता उरलेलाच नसल्याने आफ्रिकेच्या देशांमधून तो आयात करण्याचे निर्धारित करण्यात आले. या योजनेनुसार नामिबिया या देशातून 8 चित्ते, तर दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते आणण्यात आले. त्यांना मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात सोडण्यात आले असून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी वनाधिकारी आणि सुरक्षा रक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
17 पिलांचा जन्म
2022, 2023 आणि 2024 चे सहा महिने या कालावधीत या चित्त्यांपासून 17 पिलांचा जन्म झाला आहे. त्यांच्यापैकी 12 पिले सुरक्षित असून त्यांचे रुपांतर आता पूर्ण वाढ झालेल्या चित्त्यांमध्ये होत आहे. भारतात त्यांचे तग धरण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे आता चित्ता भारतात स्थिरावल्याचे दिसून येत आहे. आता या प्रकल्पाचा विस्तार करण्यात येणार असून केनिया या आफ्रिकेतील देशातून चित्त्यांची नवी तुकडी मागविण्यात आली आहे. या देशाने भारताच्या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर त्वरित या नव्या तुकडीचे भारतात आगमन होणार आहे. गांधी सागर वनामध्येही त्यांना वसविण्यात येण्याची योजना सज्ज आहे.