काँग्रेसचा जयजयकार...पण अपक्ष म्हणून; पुर्णिया जागेसाठी पप्पू यादवांकडून अर्ज
वृत्तसंस्था /पुर्णिया
हे जग एकवेळ सोडून देईन, परंतु पुर्णिया सोडणार नसल्याचे बाहुबली नेते पप्पू यादव मागील काही दिवसांपासून सातत्याने जाहीरपणे सांगत होते. बिहारमधील या मतदारसंघात राष्ट्रीय जनता दलाकडून बीमा भारती यांनी उमेदवारी अर्ज भरल्यावर पप्पू यादव यांनी लालूप्रसाद यादव यांच्यासमोर राजदच्या कंदील या चिन्हावरही निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे आर्जव केले होते.
परंतु पप्पू यादव यांना राजदने थारा दिला नाही. यामुळे पप्पू यादव यांनी आता पुर्णिया मतदारसंघात स्वत:चा अर्ज भरला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठीच्या अखेरच्या दिवशी पुर्णिया जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचत पप्पू यादव यांनी स्वत:चा अर्ज भरला आहे. यावेळी पप्पू यादव यांनी काँग्रेसचा जयजयकार केला. तसेच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा आशीर्वाद प्राप्त असल्याचा दावा केला आहे. परंतु अर्ज मात्र अपक्ष उमेदवार म्हणून भरला आहे. पप्पू यादव आता निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने पुर्णियाची लढाई त्रिकोणी झाली आहे. पप्पू यादव यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत जात काँग्रेसमध्ये स्वत:चा पक्ष विलीन केला होता. परंतु त्यांनी स्वत: काँग्रेसचे सदस्यत्व अद्याप स्वीकारले नव्हते. पप्पू यांच्या उमेदवारीप्रकरणी काँग्रेसने स्वत:चे अंग झटकले आहे. बिहार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अखिलेश सिंह यांनी पक्षाच्या चिन्हाबाहेर अपक्ष म्हणून अर्ज भरण्याची अनुमती कुठल्याही सदस्याला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाआघाडीत पुर्णिया हा मतदारसंघ राजदच्या वाट्याला गेला आहे. येथे राजदच्या वतीने बीमा भारती यांनी अर्ज भरला आहे. तर दुसरीकडे उमेदवारी अर्ज भरल्यावर पप्पू यादव यांनी राजदकडून माझी राजकीय हत्या करण्याचा कट रचण्यात आल्याचे म्हटले आहे.