केजरीवाल विरोधात दोषारोपपत्र सादर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात दिल्लीतील मद्यधोरण घोटाळा प्रकरणी सीबीआयने दोषारोपपत्र सादर केले आहे. राजकीय वर्तुळात ही घटना महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे. दिल्लीच्या राऊझ अॅव्हेन्यू न्यायालयात हे आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत एक मुख्य दोषारोपपत्र आणि 4 पुरवणी दोषारोपपत्रे सादर करण्यात आली आहेत.
नवे दोषारोपपत्र या मद्यधोरण घोटाळा प्रकरणातील सहावे आरोपपत्र आहे. याच आरोपपत्रात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची कन्या आणि आंध्र प्रदेश विधानपरिषदेतील आमदार के. कविता यांचाही आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. हे या प्रकरणातील अंतिम आरोपपत्र आहे, असे सीबीआयने स्पष्ट केले आहे.
केजरीवाल न्यायालयीन कोठडीत
या प्रकरणात केजरीवाल यांच्या विरोधात ईडी आणि सीबीआय या दोन्ही अन्वेषण यंत्रणांनी स्वतंत्र आरोपपत्रे सादर केली आहेत. त्यांना ईडीच्या प्रकरणात जामीन संमत झाला असला तरी, सीबीआय प्रकरणात मात्र तो मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना कारागृहातच रहावे लागणार आहे. त्यांनी अनेकवेळा जामीनासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र दोन्ही प्रकरणात जामीन मिळविण्यात अपयश आले आहे.
काय आहे प्रकरण
सीबीआयने सादर केलेल्या दोषारोपपत्रानुसार तेलंगणातील दारू व्यावसायिक मागुंटा श्रीनिवासलु रे•ाr यांनी 16 मार्च 2021 या दिवशी केजरीवाल यांची दिल्लीतील सचिवालयात भेट घेतली होती. आपल्या दारूव्यवसायाला दिल्लीत अनुकूल वातावरण निर्माण करुन द्यावे, अशी विनंती त्यांनी केजरीवाल यांना केली. यावेळी दिल्ली सरकारकडून नवे मद्यधोरण तयार केले जात होते. केजरीवाल यांनी ही विनंती मान्य केली आणि त्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच तेलंगणाचे तत्कालीन मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या आमदार कन्येची भेट घेण्याचा सल्ला दिला. राव यांच्या या आमदार कन्या के. कविता या त्यावेळी दिल्लीचे नवे मद्यधोरण ठरविण्यासाठी केजरीवाल यांना साहाय्य करीत होत्या. मद्यधोरणात परिवर्तन करण्यासाठी केजरीवाल यांनी रे•ाr यांच्याकडे आपल्या पक्षासाठी पैसा देण्याची मागणी केली. अशा प्रकारे हा भ्रष्टाचाराचा कट शिजविण्यात आला होता, असे सीबीआयच्या नव्या आरोपपत्रात प्रतिपादन करण्यात आले आहे.
आम आदमी पक्षाचा आरोप
केजरीवाल यांना राजकीय कैद्यासारखी वागणूक देण्यात येत आहे. केजरीवालांना एका कारस्थानाअंतर्गत बळीचा बकरा बनविण्यात आले आहे. हे कारस्थान भारतीय जनता पक्षाने रचले आहे. आम आदमी पक्ष संपविण्याच्या हेतूने हे कारस्थान करण्यात आले असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.