तिकोटा केंद्रावर भरती परीक्षेत गोंधळ
प्रश्नपत्रिका अर्धा तास उशिराने दिल्याचा उमेदवारांचा आरोप : पुनर्परीक्षेची केली मागणी
त. भा. वार्ताहर
विजापूर : पोलीस कॉन्स्टेबल भरती प्रवेश परीक्षेदरम्यान विजापूर जिह्यातील तिकोटा येथील परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ उडाल्याने शेकडो उमेदवारांनी परीक्षा बहिष्कृत करत आंदोलन केले. ही घटना रविवारी घडली. तिकोटा येथील कोट्याळ रस्त्यावरील शारदांबा शिक्षण संस्थेच्या परीक्षा केंद्रावर सकाळी 10.30 वाजता सुरू होणारी परीक्षा प्रश्नपत्रिका सुमारे अर्धा तास उशिराने म्हणजेच 11 वाजता वितरित करण्यात आल्याचा आरोप उमेदवारांनी केला.
याशिवाय, प्रश्नपत्रिका आणि ओएमआर शीटवरील अनुक्रमांक जुळत नसल्याचा, काही वर्गांमध्ये ओएमआर शीट न देता फक्त प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचा, तर काही ठिकाणी ओएमआर शीट देऊन प्रश्नपत्रिका न दिल्याचा आरोपही उमेदवारांनी केला. या सर्व प्रकारामुळे परीक्षा प्रक्रियेत मोठी अव्यवस्था झाल्याचे त्यांनी सांगितले. या गोंधळामुळे संतप्त झालेल्या शेकडो उमेदवारांनी परीक्षा बहिष्कृत करून केंद्राबाहेर येत राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. काही उमेदवारांनी परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वाराचे गेट तोडूनही संताप व्यक्त केला.
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ. के. आनंद आणि जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान, काही उमेदवारांनी परीक्षा सुरू ठेवली.
आंदोलनात सहभागी झालेल्या उमेदवारांनी भावनिक प्रतिक्रिया देताना सांगितले, ङठही आमची शेवटची संधी होती. दोन-तीन वर्षे मेहनत करून आम्ही परीक्षेची तयारी केली. पण परीक्षा प्रक्रियेतच असा गोंधळ झाल्याने आमच्या भवितव्याचे काय?, आम्हाला न्याय कुठे मिळणार?, परीक्षा प्रक्रियेतील कथित अव्यवस्थेचा निषेध करत उमेदवारांनी संबंधित परीक्षा केंद्रावरील परीक्षा रद्द करून तेथील सर्व उमेदवारांसाठी पुनर्परीक्षा घेण्याची मागणी सरकारकडे केली आहे. अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर या प्रकरणात पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.