सरकारी कार्यालयांच्या वेळापत्रकात बदल
सकाळी 8 ते दुपारी 1:30 पर्यंत कामकाज : विजापूर, बागलकोट जिल्ह्यांनाही लागू
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात वाढत्या तापमानाचा विचार करून राज्य सरकारने कित्तूर कर्नाटकातील (बेळगाव विभाग) विजापूर आणि बागलकोट तसेच कल्याण कर्नाटक (हैदराबाद विभाग) भागातील 7 जिल्ह्यांतील सरकारी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत बदल केला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात या जिल्ह्यांतील सरकारी कार्यालये सकाळी 8 ते दुपारी 1:30 या वेळेत सुरू राहणार आहेत.
बेळगाव विभागातील विजापूर आणि बागलकोट तसेच कलबुर्गी विभागातील बिदर, रायचूर, यादगीर, कोप्पळ, बळ्ळारी आणि विजयनगर या जिल्ह्यांमध्ये उन्हाळा अधिक तीव्र असतो. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील एप्रिल आणि मे या दोन महिन्यांच्या काळात येथील सरकारी कार्यालयांच्या कामकाजाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 1:30 अशी निश्चित करण्यात आली आहे. मे अखेरपर्यंत हा बदल लागू राहील.
बेळगाव विभागातील दोन जिल्हे आणि कलबुर्गी विभागातील सहा जिल्ह्यांतील सरकारी कर्मचाऱ्यांनी बदललेल्या कामाच्या वेळेत जनतेला कोणताही त्रास न देता किंवा कामात व्यत्यय न आणता नेहमीप्रमाणे आपली कर्तव्ये पार पाडावीत तसेच जिल्हाधिकारी किंवा जिल्हा पंचायतींच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपत्कालिन परिस्थितीत कोणतेही काम करण्याचे निर्देश दिल्यास वेळेची मर्यादा न ठेवता आपली कर्तव्ये पार पाडावीत, असा उल्लेख आदेशपत्रकात करण्यात आला आहे.