पाकिस्तानवरील अचूक हल्ल्यांबद्दल शहर-परिसरात आनंद साजरा
बेळगाव : पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्याचा वचपा भारतीय सैन्याने बुधवारी काढला. सैन्याने जशास तसे उत्तर दिल्याने बेळगावमध्ये जल्लोष करण्यात आला. खडक गल्ली, चन्नम्मा चौक येथे नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष व्यक्त केला. त्याचबरोबर शहराच्या इतर भागातही जल्लोषाचे वातावरण होते. भारतीय पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 पर्यटक मृत्युमुखी पडले. त्यामुळे मागील आठवडाभर संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त होत होती. पाकिस्तान, तसेच दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देण्याची मागणी देशवासियांतून होत होती. अखेर बुधवारी भारतीय सैन्याने एअर स्ट्राईकच्या माध्यमातून दहशतवाद्यांचे तळ नेस्तनाबूत केले. त्यामुळे पहाटेपासूनच नागरिकांच्या मोबाईलवर वचपा काढल्याचे संदेश फिरू लागले. देशभरात जल्लोष करून भारतीय सैन्याचे कौतुक करण्यात आले. बेळगावमध्ये अनेक गल्ल्यांमध्ये फटाके फोडून, मिठाई वाटून नागरिकांनी आनंद व्यक्त केला. यापुढे पाकिस्तान, तसेच दहशतवादी देशावर हल्ला करण्यापूर्वी चारवेळा विचार करतील, अशी परिस्थिती भारतीय सैन्याने निर्माण करून ठेवल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. नगरसेवक शंकर पाटील यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसोबत चन्नम्मा चौक येथे फटाके फोडून आनंद व्यक्त केला.