मोहोराने बहरताहेत काजूच्या बागा
हवामानात सकारात्मक बदल : योग्य दराची अपेक्षा : बागांमधील पालापाचोळा स्वच्छतेसाठी लगबग
बेळगाव : काजू पिकाला पालवी फुटून मोहोर येऊ लागला आहे. त्यामुळे यंदा काजू उत्पादन समाधानकारक होईल, अशी अपेक्षा उत्पादकांना लागली आहे. काजू मोहोर संरक्षणासाठी व योग्य औषध फवारणीसाठी उत्पादकांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही खात्याने केले आहे. हवामानातील सकारात्मक बदलांमुळे काजूबागा बहरू लागल्या आहेत. त्यामुळे काजू उत्पादन वाढण्याची आशा शेतकऱ्यांना लागली आहे. काजूला फळधारणा सुरू होत असल्याने येत्या दिवसात पालापाचोळा आणि स्वच्छतेचे काम हाती घेतले जाणार आहे. मागील वर्षी काजू दरात मोठी घसरण झाली होती. केवळ 90 ते 95 रुपये प्रतिकिलो दर काजूला मिळाला होता. त्यामुळे यंदा तरी समाधानकारक दर मिळेल का, या चिंतेत शेतकरी सापडले आहेत. तालुक्यातील कुद्रेमनी, बाची, कल्लेहोळ, बेळगुंदी, बाकनूर, बेळवट्टी, गोल्याळी, बडस, सोनोली, बसुर्ते, बेकिनकेरे, जानेवाडी, कर्ले, अतिवाड, कोनेवाडी आदी भागात काजूचे उत्पादन घेतले जाते. जिल्ह्यात केवळ खानापूर आणि बेळगाव तालुक्यातच काजूचे क्षेत्र आहे. मागील चार वर्षांत काजू उत्पादकांना म्हणावा तसा दर मिळाला नव्हता. शिवाय बदलत्या वातावरणामुळे उत्पादनातदेखील मोठी घट झाली होती. यंदा काजूला मोहोर बहरू लागला आहे. त्यामुळे उत्पादकांच्या आशा-अपेक्षा उंचावल्या आहेत.
स्थानिक पातळीवर काजू बाजारपेठ उपलब्ध करा
अलीकडे काजूचे क्षेत्र वाढले आहे. कोकणातील दर्जेदार बियाणांची लागवड तालुक्यात होऊ लागली आहे. त्यामुळे काजूचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे साहजिकच उत्पादनात वाढ होऊ लागली आहे. मात्र, काजूला स्थानिक बाजारपेठ उपलब्ध नसल्याने उत्पादकांना मिळेल त्या दरात काजू विकावी लागते. त्यामुळे स्थानिक पातळीवर काजू बाजारपेठ उपलब्ध करावी, अशी मागणीही होत आहे. मध्यंतरी बदलत्या हवामानाचा मोहोरावर परिणाम झाला होता. मात्र, पुन्हा आता काजू मोहोर बहरू लागला आहे. त्यामुळे बागांच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले जाणार आहे. मार्च-एप्रिलदरम्यान काजूचे उत्पादन सुरू होते. सध्या झाडांना मोहोर अधिक प्रमाणात दिसू लागला आहे.