भांबेडमध्ये काजू बागेला आग
लांजा :
तालुक्यातील भांबेड येथील महावितरण कंपनी सबस्टेशनच्या बाजूला स्पार्क झाल्याने आग लागली. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरासह अभिजित गांधी यांची काजू कलमाची बाग महावितरण कंपनीची ३३ केव्हीची वायर जळल्याने मोठे नुकसान झाले. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी राजापूर येथून अग्निशमन बंब बोलावण्यात आले. परंतु बंब येईपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केल्याने सर्व काही जळून खाक झाले होते.
या आधी तालुक्यातील खोरनिनको, प्रभानवल्ली, पालू-चिंचुर्टी येथे आगीच्या घटना ताज्या आहेत. तसेच तालुक्यात काही ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. यात लाखोंचे नुकसान झाले. अशातच १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वा. भांबेड येथील सबस्टेशन बाजूला स्पार्क झाल्याने आग लागल्याचे समजते. तसेच आजूबाजूला असणाऱ्या गवतानेही पेट घेतला. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी राजापूर येथून अग्निशमन बंब बोलावण्यात आला होता. दुपारी १ वा. बंब सबस्टेशन भांबेड येथे दाखल झाला. गवत असल्याने हा.. हा म्हणता आगीने रौद्र रूप धारण केले. तसेच बाजूला असलेल्या अभिजित गांधींची काजूची बाग जळून खाक झाली. बंब पोहचण्याआधीच सर्व काही जळून खाक झाले. यात गांधींचे मोठे नुकसान झाले. यावेळी घटनास्थळी महावितरण कंपनीचे अधिकारी, माजी नगरसेवक राजू हळदणकर, ग्रामस्थ उपस्थित होते.
अग्निशमन बंब असता तर आगीपासून होणाऱ्या नुकसानीचा बचाव करता आला असता, असे बोलले जात आहे. आगीच्या घटना वाढत असल्याने तालुक्यासाठी अग्निशमन बंबाची आवश्यकता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लांजा नगर पंचायतीला अग्निशमन बंब केव्हा मिळणार, असा सवाल जनतेतून केला जात आहे.