वणव्यांमुळे काजू बागायतदार शेतकरी हवालदिल
शासनाची नुकसान भरपाई तुटपुंजी ; शेतकऱ्यांचा आरोप
नीलेश परब/न्हावेली
मळेवाड,न्हावेली,आरोस,मातोंड परिसरात काजू हे उत्पादन शेतकऱ्यांसाठी उपजीविकेचे महत्वाचे साधन आहे.मात्र गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील शेतकऱ्यांसाठी वणवा हा चिंतेची बाब ठरत असून.वणव्यांवर योग्य उपाययोजना नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मळेवाड,न्हावेली,आरोस,मातोंड परिसरात पावसाळी ,उन्हाळी शेती शेतकऱ्यांकडून केली जाते.असे असले तरी काजू उत्पादन हेच उपजीविकेचे मुख्य साधन आहे.काजू पिकावरच अर्थकारण अवलंबून असल्याने शेतकरी काजू बागायतीत दरवर्षी लागवड करतात.काजू उत्पादन वाढविण्यासाठी परिश्रम घेतात.मात्र गेल्या काही वर्षांपासून काजू बागायतीमध्ये लागलेल्या वणव्यांची संख्या विचारात घेता शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे.काही वणवे विद्युत वाहिन्यांमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे लागतात मात्र,नव्वद टक्के लागलेल्या वणव्यांची कारणे अनभिज्ञ आहेत. ऐन दुपारी वणवे लागत असल्याने त्यावर नियंत्रण मिळविणेही कठीण जात आहे.मार्च, एप्रिल हा काजू पिकासाठी महत्वाचा कालावधी असून जानेवारी ,फेब्रुवारी, मार्च महिन्यातच वणवे लागत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.अशीच स्थिती यापुढेही राहिल्यास शेतकऱ्यांना आपली उपजीविका चालविणे कठीण होणार आहे.वणव्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे शेतकरीही निरुत्साही बनला आहे.वणवा लागलेल्या काजू बागायतीतील आगीपासून बजावलेली काजू झाडे एक दोन वर्षातच नष्ट होतात.त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन बाग करणे भाग पडते.वणव्यांवर योग्य तोडगा निघणे गरजेचे असून त्या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.अन्यथा शेतकऱ्यांनाही जगणेही कठीण होणार आहे.हातातोडांशी आलेले पीक वणव्यांमुळे नष्ट होत असल्याने मळेवाड,न्हावेली,आरोस ,मातोंड परिसरात गेल्या काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.
शासनाकडून मीठ चोळण्याचे काम !
काजू बागायतीला आग लागल्यानंतर नुकसान भरपाई देण्यासाठी संबधित विभागाकडून पंचयादी घातली जाते.मात्र शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई फारच तुटपुंजी असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखेच असल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.